– अमित डोंगरे
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्माला पंचांनी ज्या पद्धतीने पायचित बाद दिले त्यावरून डीआरएस किंवा पंचगिरी थट्टा आहे की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. डीआरएसद्वारे अत्यंत अचूक निर्णय दिले जातात असे सांगितले जाते. मात्र, मग जर तंत्रज्ञानाचीच मदत घ्यायची असते त्यात अम्पायर कॉल कशासाठी.
या सामन्यात ओली रॉबिन्सनच्या गोलंदाजीवर रोहितला पायचित बाद दिले गेले. तेव्हा त्याने डीआरएसची मागणी केली. चेंडू लेगसाईडला जात असल्याचा त्याला विश्वास होता. पंचांनीही डीआरएस कॉल घेतला. त्यात व्हिडिओ रिप्लेमध्ये चेंडू जरी उजव्या यष्टीच्या समोर पडल्याचे दिसत असले तरीही तो लेग साईडला म्हणजेच यष्टीच्या बाहेरून जात असल्याचे स्पष्ट दिसत होते. तरीही अम्पायर कॉलद्वारे रोहितला बाद दिले गेले.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही या डीआरएसवर संताप व्यक्त केला आहे. या नियमातील पंचांचा कॉल (अम्पायर कॉल) वादग्रस्त ठरत आहे. जर तिसरा पंच व्हिडिओ रीप्लेमध्ये चेंडू यष्टीच्या बाहेर जात असल्याचे पाहात असेल तर मग मैदानावरील पंचांच्या कॉलला का महत्त्व दिले जात आहे. ही नियमांची थट्टा नव्हे का.
जर मैदानावरील पंच आपल्याच निर्णयाबाबत ठाम नसतील तर तिसरा पंच निर्णय देतो. मग मैदानावरील पंचाचा कॉल महत्त्वाचा का ठरवण्यात येतो. हा नियम जास्तीत जास्त बिनचूक व्हावा यासाठी त्यातील अम्पायर कॉलची तरतूद रद्द केली जावी, असेच आता म्हणावे लागेल. केवळ मैदानावरील पंचांचे महत्त्व टिकवण्यासाठीच ही तरतूद केल्याचे उघड आहे. या मालिकेतच नव्हे तर डीआरएस अस्तित्वात आल्यापासून पंचगिरीही आपला दर्जा हरवत चालली असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. याचाही कुठेतरी विचार केला जावा.
पंचांकडे अपील केल्यावर ते बाद किंवा नाबाद ठरवतात. त्यावर आक्षेप असेल तर दोन्ही संघांना डीआरएस घेता येतो. त्यात मैदानावरील पंच तिसऱ्या पंचाकडे हा निर्णय सोपवतात. तिसरा पंच परिस्थिती व रिप्ले पाहून त्यावर निर्णय देतो. मात्र, यात एक त्रुटी सातत्याने दिसून येत आहे. ती म्हणजे मैदानावरील पंचांचा कॉल. पायचितचा निर्णय दिल्यावर त्याबाबत डीआरएस घेतला गेला तर तिसरा पंच मुख्य तीन मुद्दे विचारात घेतो.
चेंडूचा टप्पा, दिशा आणि फलंदाजाला चेंडू जिथे लागला (पॉइंट ऑफ इम्पॅक्ट) तिथे न लागता चेंडू यष्टीवर गेला असता का. मात्र, जरी रिप्लेमध्ये चेंडू यष्टीच्या समोरच फलंदाजाच्या पायाला लागला असेल, तसेच दिशा यष्ट्या उद्ध्वस्त करणारी असेल तसेच चेंडूचा टप्पा ऑफ स्टम्पच्या समोरचाच असेल तर तो फलंदाज बाद दिला जातो. मात्र, त्यात मैदानावरील पंचाचा कॉल हा देखील एक वादग्रस्त मुद्दा येतो. जर मैदानावरील पंचाने नाबाद ठरवले असेल तर फलंदाज बाद दिला जात नाही, असे कित्येकदा घडलेले आहे. त्यामुळे जर मैदानावरील पंचाचाच निर्णय कायम ठेवला जाणार असेल तर त्या डीआरएसला काही अर्थच उरत नाही.
क्रिकेटचे नियम तयार करणाऱ्या मेरिलिबोर्न क्रिकेट क्लबने (एमसीसी) डीआरएसचा अनाकलनीय नियम हट्टाने राबवला आहे. पंचांचा कॉल हा मुद्दाच निकाली काढला गेला पाहिजे. पंचांचा कॉल अर्थहीन आणि डोकेदुखीच ठरत आहे. डीआरएसची मर्यादा अनेकदा उघडी पडलेली आहे. आता तरी एमसीसी व आयसीसीने याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. नियम तयार करा पण त्याची योग्यता कोण तपासणार?