-अमित डोंगरे
आयपीएल स्पर्धा दोन देशांमधील किंवा दोन शत्रूंमधील नव्हे; पण तरीही त्यात खेळाडूंचे इगो, अॅरोगन्सी, अॅटिट्यूड स्पष्ट दिसून येत आहे. ही धोक्याची घंटा आहे. यावर वेळीच नियंत्रण आणले गेले नाही तर आताचे होत असलेले वाद हाणामारीत रूपांतरित व्हायला वेळ लागणार नाही. जे राजस्थान, बेंगळुरू व मुंबईच्या सामन्यात घडले ते प्रत्येक स्पर्धेत प्रत्येक सामन्यात घडताना दिसेल व त्यावेळी हा सभ्य गृहस्थांचा खेळ गुन्हेगारांचा ठरेल.
राजस्थान रॉयल्सच्या राहुल तेवतियाने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात ज्या पद्धतीने आपल्या संतापाची परिणती भांडणात झाल्याचे दाखवून दिले ते पाहता तेवतिया अजून मोठ्या स्तरावर खेळलेला नसताना हे रूप तर तो आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळायला लागला तर काय करेल.
मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर बेंगळुरू यांच्यातील सामन्यातही जे घडले ते क्रिकेटच्या सभ्यतेला मारकच आहे. या सामन्यात डेल स्टेन 13 व्या षटक टाकत होता. या षटकातील अखेरच्या चेंडूवर सूर्यकुमारने चेंडू फटकावला. त्याचवेळी बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने चेंडू अडवला व सूर्यकुमारकडे डोळे वटारून पुढे आला.
सूर्यकुमारनेही त्याच्याकडे कटाक्ष टाकला. सूर्यकुमारला स्लेजिंग करण्याचा त्याने प्रयत्न केला. मात्र, सूर्यकुमारने कोणताही प्रतिसाद दिला नाही. उलट कोहलीच टीकेचा धनी बनला. या दोघांमध्ये कोणतीही शाब्दिक देवाणघेवाण घडली नसली तरीही कोहलीने जे केले ते एक कर्णधार म्हणून अत्यंत चुकीचे होते.
यानंतर मुंबई इंडियन्सच्याच बाबतीत आणखी एक घटना घडली. याही वेळी संघ बेंगळुरूचाच होता. फक्त खेळाडू कोहली नव्हे तर ख्रिस मॅरिस होता व प्रतिस्पर्धी फलंदाज सूर्यकुमार नव्हे तर हार्दिक पंड्या होता. या पंड्याचे वर्तन गेल्या दोन-तीन वर्षांपासून जरा अनेकांना खटकत आहे. गरिबीत दिवस काढल्यानंतर आलेला पैसा, पत, प्रतिष्ठा, मानसन्मान सगळे काही मिळाल्यानंतर अनेकांचे पाय जमिनीवर राहात नाहीत. या पंड्याने मॉरिसविरुद्ध जे हातवारे केले किंवा या दोघांमध्ये जो खटका उडाला ते पाहता हा क्रिकेटचा सामना आहे का युद्ध हेच कळेनासे झाले.
अर्थात याचे रेकॉर्डिंग पाहून सामधिकाऱ्यांनी त्यांना कडक शब्दांत समज दिली पण त्याचा काही उपयोग होईल का, ते पुढील काळात समजेलच. एक कर्णधार म्हणून कोहलीचे या प्रकारांवर नियंत्रणच नव्हते. तो स्वतःच अशा अनेक वादात अडकला आहे तो दुसऱ्याला काय उपदेश करणार म्हणा.
मुंबईची फलंदाजी सुरू असताना 19 व्या षटकात हा गैरप्रकार घडला. पंड्याने मॉरिसच्या चेंडूवर षटकार फटकावला होता. पण त्याच षटकात मॉरिसने पंड्याला बाद करत वचपा काढला. तो बाद होऊन परतत असताना मॉरिसनेही काहीतरी इशारा केला व त्यामुळे त्यांच्यात पुन्हा एकदा चकमक घडल्याचे दिसले. या दोन्ही खेळाडूंनी आपली चूक कबूल केली असली तरीही त्यातून काही बोध घेणार का, याची खात्री कोणीही देणार नाही.
असो, या केवळ काही घटना घडल्या असे आयपीएल समितीने किंवा बीसीसीआयने समजले तर ती पुन्हा एक मोठी चूक ठरेल. कारण शिक्षा काय आहे हे समजल्यावर कोडगेपणा वाढीला लागतो असे म्हणतात ते काही खोटे नाही.