मुंबई – जगभरात सध्या करोनाने हाहाकार माजवला आहे. आता हा धोका संपुष्टात आल्यानंतर जेव्हा स्पर्धा सुरु होतील तेव्हा प्रत्यक्ष सामन्यापूर्वी सर्वांना सराव करण्यासाठी वेळ मिळाला पाहिजे, असे मत भारताचा शैलीदार फलंदाज अजिंक्य रहाणे याने व्यक्त केले आहे.
करोनानंतरच्या क्रिकेटबाबत विचार केला तर इतक्या मोठ्या खंडानंतर पुन्हा मैदानात उतरुन सरस व सातत्यपूर्ण कामगिरी करणे प्रत्येकाला जड जाणार आहे. आज सगळे आपापल्या घरात आहेत. व्यायाम जरी होत असला तरीही मॅच प्रॅक्टिस त्यापेक्षाही महत्त्वाची असते. सामन्यापूर्वी सराव केल्यावर पुन्हा एकदा चेंडूवर नजर स्थिरावते. अचानक मैदानात उतरुन फलंदाजी करणे सोपो नसते, असेही रहाणेने सांगितले.
करोनानंतरचे क्रिकेट मग ते देशांतर्गत असो किंवा आंतरराष्ट्रीय त्याला जुळवून घेणे सगळ्यांनाच कठीण असेल. जर पुढील काळात एखादी मालिका निश्चित झाली तर त्यापूर्वी किमान 20 ते 25 दिवसांचे सराव शिबिर आयोजित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आता इतक्या मोठ्या खंडानंतर सराव न करता सामना खेळला तर कामगिरी कशी होइल याचा अंदाज सगळेच लावू शकतात, असेही रहाणे म्हणाला.
करोनानंतरची परिस्थिती काय असेल असा विचार जेव्हा मनात येतो तेव्हा आगामी काळात क्रिकेट व खेळाडूंमध्ये खूपच मोठा बदल होणार आहे. सामना जिंकल्यावर किंवा कामगिरी यशस्वी झाल्यावर खेळाडूंना शेकहॅण्ड न करता नमस्कार करावा लागेल. करोनाचे सावट जरी दूर झाले तरी पुढील किमान 6 महिने सोशल डिस्टंन्सिगचे पालन करावेच लागेल, असेही रहाणेने सांगितले.
…तरच क्रिकेट सुरु व्हावे
करोनानंतरच्या क्रिकेटबाबत आपण बोलत होतो. मात्र, मला असे वाटते की जोपर्यंत करोनावर रामबाण उपाय शोधला जात नाही तो पर्यंत क्रिकेट सुरुच होऊ नये. एका बाजुला हा धोका असताना खेळाडू बिनधोकपणे खेळूच शकत नाहीत. त्यांच्यावर कामगिरीच्या दबावाबरोबरच करोनाच्या धोक्याचे दडपण देखील असेल, त्यामुळे आधी करोनाचा नायनाट व्हावा व त्यानंतरच स्पर्धा सुरु केल्या जाव्यात, असे मतही रहाणेने मांडले.