नवी दिल्ली – इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) सहभाग घ्यायचा का नाही याचा निर्णय सर्वस्वी खेळाडूंवर सोपविण्यात आला असल्याचे मत आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू संघटनेने स्पष्ट केले आहे. करोना विषाणूंचा प्रसार जगभरात वेगाने होत आहे, त्यामुळे यावेळी आयपीएल 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. स्पर्धा जरी पुढे ढकलली असली तरीही त्यात सहभाग घ्यायचा का ते ठरविण्याचा अधिकार खेळाडूंवर सोपविला आहे.
स्पर्धा वेळापत्रकात जरी बदल केला असला तरीही त्यावेळी काय परिस्थिती असेल ते पाहून मगच खेळाडूंनी निर्णय घ्यावा. आपले आरोग्य यापेक्षा कोणतीही गोष्ट महत्त्वाची नाही, त्यामुळे एक संघटना म्हणून आम्ही खेळाडूंच्या पाठीशी ठामपणेउभे आहोत.
या स्पर्धेत सहभागी व्हायलाच पाहिजे, अशी जबरदस्ती खेळाडूंवर कोणीच करू शकत नाही, असे संघटनेने स्पष्ट केले आहे. करोनामुळे येत्या 29 मार्चपासून सुरू होणारी आयपीएल स्पर्धा आता 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.