काकासाहेब कोयटे प्रतिपादन
मंचर-पतसंस्थांनी ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सेवेत स्पर्धा जरुर करावी. परंतू पतसंस्थांनी कर्ज वितरण करताना समन्वय ठेवून ग्राहकांना कर्ज द्यावे. त्यामुळे पतसंस्थांना कर्ज वितरण करताना कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे एकच व्यक्ती, विविध संस्था, बॅंका, पतसंस्था यामधून कर्ज प्रकरण घेत आहे. त्याला अटकाव होईल, असे प्रतिपादन राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी केले.
मंचर (ता. आंबेगाव) येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या सभागृहात संत ज्ञानेश्वर पतसंस्थेच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्यातील पतसंस्थांसोबत बैठक झाली. या बैठकीस सुमारे 40 पतसंस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. संत ज्ञानेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष यतीनकुमार हुले यांनी तालुक्यातील पतसंस्थांच्या कामकाजाविषयी माहिती राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांना दिली.
याप्रसंगी निघोटवाडी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष मारुती निघोट, टी.एस.ग्रामीणचे मधुकर बोऱ्हाडे, संत ज्ञानेश्वर पतसंस्थेचे संचालक अशोक घुले, शरद ग्रामीण पतसंस्थेचे प्रमोद वळसे पाटील, भीमाशंकर कारखान्याचे संचालक बाळासाहेब घुले, शांताराम हिंगे, अनुसया पतसंस्थेच्या उपाध्यक्षा वैशाली बेंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी गायत्री वाळेकर, पराग नागरी पतसंस्थेचे व्यवस्थापक सदाशिव भुसारी यांच्यासह विविध पतसंस्थांचे सचिव यावेळी उपस्थित होते. सुत्रसंचालन जगदीश घिसे यांनी केले. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता पोखरकर यांनी आभार मानले.