पुणे – तीन आमदार गेल्याने जर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना एवढा धक्का बसला असेल तर यापुढील काळात आणखी बरेच जण येणार आहेत. त्यामुळे त्यांनी आतापासूनच या धक्क्यांची मानसिकता तयार करावी, असा सूचक इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी शुक्रवारी दिला. त्याचबरोबर शो हाऊसफुल्ल झाला तरी मान्यवरांसाठी काही जागा राखीव ठेवल्या जातात तशा आम्हीदेखील ठेवल्या आहेत, अशी स्पष्टोक्ती करत भाजपमध्ये आणखी काही दिग्गज येणार असल्याचे संकेतही दिले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने पाटील यांच्या वार्तालापाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, उपाध्यक्ष अभिजीत बारभाई उपस्थित होते. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुका, भाजपची वाढती ताकद आणि विरोधकांचे झालेले खच्चीकरण या वेगवेगळ्या विषयांवर मते मांडली.
पक्षांतर करण्यासाठी “ईडी’ची भीती दाखवली जात असल्याची टीका शरद पवार यांनी केली होती. त्याबाबत विचारले असता पाटील म्हणाले, नारायण राणे, छगन भुजबळ, गणेश नाईक यांना ईडीची भीती दाखवून पक्षात घेतले होते काय? तुम्ही त्यावेळी केले ते भावनिक आवाहन होते आणि आता आम्ही जे करतो ते म्हणजे “ईडी’चा धाक दाखवून करतो, असे म्हणणे चुकीचे आहे.
ईडी किंवा इन्कमटॅक्सची चौकशी करणे एवढे सोपे नसते. त्याला दोन वर्षे लागतात. आठ दिवसांत होण्यासारखी ही गोष्ट नाही, असेही स्पष्टीकरण पाटील यांनी दिले.
आयोगाने ठरवावे…
सर्व पक्षांनी ईव्हीएमला विरोध केला असून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. त्याबाबत विचारले असता पाटील म्हणाले, निवडणूक कशी घ्यायची हा अधिकार स्वायत्त संस्था असलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाचा आहे. लोकशाही मानणारा आमचा पक्ष आहे. त्यांच्या निर्णयामध्ये आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही, निवडणुका घेण्यासाठी कोणते माध्यम वापरायचे हा त्यांचा निर्णय आहे.