कोयनानगर -सलग सहा दिवसांपासून कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधारा पाऊस कोसळत आहे. धुवॉंधार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून धरण पुर्णक्षमतेने भरण्यास सज्ज झाले आहे. पाणलोट क्षेत्रात थैमान घालणाऱ्या पावसामुळे वाढत जाणारी धरणाची जलपातळी नियंत्रित करणे गरजेचे आसल्याने कोयना प्रशासनाने गुरूवारपासून जलपातळी नियंत्रित करण्याच्या प्रयोगाला सुरुवात केली आहे.
कोयना धरणाचा पायथा वीजगृह चालू करून त्यामाध्यमातून 2,100 क्युसेस्क पाणीसाठा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. तर शुक्रवारी सकाळी 10 वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे 1 फ़ूट 6 इंच वर उचलून त्यातून 10,100 क्युसेक पाणीसाठा नदीपात्रात सोडण्यात येणार असल्याचे कोयना व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.
गत चोवीस तासात धरण पाणलोट क्षेत्रात कोयनानगर
येथे 192 मिमी, नवजा येथे 112 मिमी तर महाबळेश्वर येथे 188 मिमी पाऊसाची नोंद झाली होती. गुरूवारी दिवसभर पाणलोट क्षेत्रात पाऊसाचा जोर कायमच आहे. कोयनानगर येथे 69/3140 मिमी, नवजा येथे 29/3771 मिमी तर महाबळेश्वर येथे 63/3959 मिमी पाऊसाची नोंद झाली आहे. पाणलोट क्षेत्रात सर्वदूर ठिकाणी पाऊसाचा जोर कायमच आसल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक 55,447 क्युसेक आहे. धरणाची जलपातळी 2147.00 फ़ूट झाली असून धरणात 85.21 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.