हैदराबाद – भारत बायोटेक कंपनीच्या करोनावरील लसीच्या (कोव्हॅक्सीन) सुरक्षिततेवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यापार्श्वभूमीवर, लसीवरून होणारे राजकारण अयोग्य असल्याची प्रतिक्रिया कंपनीने दिले. त्याशिवाय, कंपनीने स्वत:ला संशोधनाबाबत असलेल्या प्रचंड अनुभवाकडेही लक्ष वेधले.
चाचण्यांचा तिसरा टप्पा पूर्ण केला नसतानाही कोव्हॅक्सीनला मंजुरी देण्यात आल्याच्या निर्णयावर आक्षेप घेतला जात आहे. त्यावर भारत बायोटेकचे अध्यक्ष कृष्णा एल्ला यांनी येथे पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. माझ्या कुटूंबाचा कुठल्याच राजकीय पक्षाशी संबंध नाही.
त्यामुळे लसीवरून राजकारण केले जाऊ नये. लसीबाबतचा आमचा तपशील पारदर्शक नसल्याचा आरोप होत आहे. पुरेसा तपशील आम्ही याआधीच जाहीर केला आहे. तो इंटरनेटवर उपलब्ध आहे, असे त्यांनी नमूद केले. भारतीय कंपन्यांना कमी लेखले जात आहे. मात्र, आमच्या कंपनीचे कार्य करोनावरील लस बनवणाऱ्या फायझर या अमेरिकी कंपनीपेक्षा कमी नाही.
जगातील अनेक देशांमध्ये भारत बायोटेक याआधीच पोहचली आहे. संशोधनाचा प्रदीर्घ अनुभव असणारी आमची एकमेव कंपनी आहे, असा दावा त्यांनी केला. भारत बायोटेक लस निर्मितीसाठी चार केंद्रे उभी करत आहे. त्याद्वारे प्रतिवर्षी 70 कोटी डोस बनवले जातील. सध्या आमच्याकडे 2 कोटी डोस उपलब्ध आहेत, अशी माहितीही एल्ला यांनी दिली.