पुणे – एखाद्या कामगाराचा करोनाने मृत्यू झाला असेल, तर त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांना “कामगार राज्य विमा महामंडळा’कडून “कोविड रिलिफ स्कीम’ (सीआरएस) अंतर्गत पेन्शन मिळू शकते. परंतु त्यासाठी प्रक्रिया योग्यप्रकारे पूर्ण केली तर, एका महिन्यात कुटुंबीयांना कायमस्वरूपी पेन्शनचा आधार मिळू शकतो. कामगाराच्या कामाच्या वर्षाप्रमाणे आणि एकूणच पगाराप्रमाणे पेन्शनची रक्कम ठरते.
आवश्यक बाबी
करोनाने मृत्यू झालेल्या संबंधित कामगाराची नोंद ही त्याच्या करोना अहवाल यायच्या आधी किमान तीन महिने “ईएसआयसी’चा पंजीकृत असणे आवश्यक आहे. त्याचा मृत्यू करोनाचा अहवाल आल्यानंतर 45 दिवसांच्या आत झाला असेल तरच “सीआरएस’चा लाभ त्याला मिळू शकतो.
या तीन महिन्यांच्या कालावधीत त्याने किमान 70 दिवस काम केलेले असले पाहिजे. तशी नोंद “ईएसआयसी’कडे असणे आवश्यक आहे.
अशी आहे प्रक्रिया
एखाद्या कामगाराचा करोनाने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांचा तपशील या “सीआरएस’ स्कीमसाठी आवश्यक आहे.
क्लेम फॉर्म
फॉर्म 1 – “सीआरएस’ साठी चार प्रकारचे फॉर्म भरणे आवश्यक आहे. त्यामध्ये संबंधित व्यक्तीचा तपशील येतो. त्याच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीचा तपशील त्यात येतो. उदा. आई, वडील, पत्नी, मुले वगैरे यांची नावे येतात. त्यांचे आधारकार्ड आदी तपशील, गॅझेटेड अधिकाऱ्याचा त्यावर सही शिक्का आवश्यक.
फॉर्म 2 – संबंधित कामगाराला पत्नी, मुलगा, मुलगी कोणी नसेल, तो अविवाहित असेल. केवळ आई-वडील असतील, तर त्याच्यावर अवलंबून असलेल्यांसाठी हा स्पेशल फॉर्म आहे.
फॉर्म 3 – अवलंबून असणाऱ्यांचा बॅंकेचा तपशील
फॉर्म 4 – अवलंबून असणाऱ्यांच्या हयातीचा तपशील (लाइफ सर्टीफिकेट प्रमाणे)
क्लेम फॉर्मशिवाय अन्य बंधनकारक
असलेली कागदपत्रे
संबंधित मृत कामगाराचा करोना पॉझिटिव्ह असल्याचा आरटी-पीसीआर अहवाल
मृत्यूदाखला
रुग्णालयाकडून दिली जाणारी वैद्यकीय कागदपत्रे
(आजाराची समरी)
अवलंबून असणाऱ्यांचा वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड अथवा जन्मदाखला
कामगार जेथे काम करत होता, त्या कार्यालयातील कामाची आवश्यक कागदपत्रे
संपर्क साधण्याचे आवाहन
“ईएसआयसी’कडे नोंदणी झालेल्या एखाद्या कामगाराचे करोनाने निधन झाले असल्यास त्याच्या कुटुंबीयांनी आपल्या परिसरातील “ईएसआयसी’च्या शाखेत संपर्क साधून पेन्शन मिळण्याबाबत अधिक माहिती मिळवू शकतात. शिवाय, याबाबत प्रशासनाकडून विविध पद्घतीने जनजागृती करण्यात येत आहे. मृताच्या कुटुंबीयांनी कागदपत्रांची पूर्तता करून या पेन्शनचा लाभ घ्यावा, असे आवाहन “ईएसआयसी’ प्रशासनाने केले आहे.