भुवनेश्वर – महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, दिल्लीनंतर आता ओडिशामध्येही करोना लसीचा तुटवडा निर्माण झाला असून त्यामुळे लसीकरण केंद्र बंद करण्यात आली आहेत. तसे बोर्डच केंद्रांबाहेर लावण्यात आले आहेत. ओडिशाचे आरोग्यमत्र्यांनी केंद्र सरकारला एक पत्र लिहून यासंदर्भात माहिती दिली आहे.
आरोग्य मंत्री किशोर दास यांच्या म्हणण्यानुसार, राज्यात अनेक ठिकाणी लसीकरणाचे काम थांबवण्यात आले आहे. राज्यात केवळ दोन दिवस पुरेल एवढा लसीकरण साठा आहे. अशावेळी लसीचे आणखी डोस लवकरात लवकर पुरवण्यात आले नाहीत तर संपूर्ण राज्यात लसीकरण मोहीम ठप्प होईल.
राज्यात प्रत्येक दिवशी अडीच लाख डोस दिले जातात. म्हणजेच, राज्याकडे उपलब्ध असलेला साठा केवळ दोन दिवस पुरेल. आम्ही केंद्राकडे कमीत कमी 25 लाख डोस ताबडतोब पाठवण्याची विनंती केली आहे. त्यामुळे पुढचे दहा दिवस लसीकरण मोहीम सुरू राहू शकेल असे त्यांनी म्हटले आहे.