नवी दिल्ली – सरलेल्या वर्षात (2020) भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या संख्येत सुमारे 75 टक्क्यांनी घट झाली. करोना संकटामुळे घालण्यात आलेल्या प्रवास निर्बंधांमुळे तसे घडले.
संबंधित माहिती केंद्रीय पर्यटन मंत्री प्रल्हाद पटेल यांनी मंगळवारी राज्यसभेत लेखी उत्तराद्वारे दिली. देशात सर्वप्रथम 2017 मध्ये परदेशी पर्यटकांच्या संख्येने 1 कोटीचा टप्पा ओलांडला.
पुढील दोन वर्षांत ती संख्या ओलांडली गेली. मात्र, 2020 मध्ये केवळ 27 लाख पर्यटकांनी भारताला भेट दिली. करोना संकटामुळे पर्यटन क्षेत्राचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे संबंधित घटकांकडून सांगितले जात आहे. त्या नुकसानीचा आढावा घेण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
जम्मू-काश्मीरमधील पर्यटकांचा ओघही आटला
जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा 5 ऑगस्ट 2019 या दिवशी रद्द करण्यात आला. तेव्हापासून तिथे जाणाऱ्या पर्यटकांचा ओघही आटल्याची माहिती पटेल यांनी दुसऱ्या उत्तरात दिली. जम्मू विभागापेक्षा काश्मीर खोऱ्याला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय घट झाली. अर्थात, मागील काही महिन्यांपासून जम्मू-काश्मीरमधील पर्यटकांची वर्दळ वाढत आहे, असेही त्यांनी सूचित केले.