सागर ननावरे
नुकताच 9 डिसेंबर जागतिक भ्रष्टाचार विरोधी दिन जगभरात पाळला गेला. जगातील सर्वांत मोठी लोकशाही असणाऱ्या आपल्या देशात ही समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावताना दिसते.
भ्रष्टाचार हा आपल्या अंगवळणी पडला आहे. सरकारी कार्यालये, विविध संस्था अशा सर्वच क्षेत्रांत चिरीमिरी दिल्याशिवाय कामे पुढे सरकत नाहीत. किंबहुना ही चिरीमिरी दिल्याशिवाय कामेच होत नाहीत हा अलिखित नियमच बनला आहे. भारतात भ्रष्टाचार हा शासकीय यंत्रणेचा एक अविभाज्य भाग असल्याचे बोलले जाते. परंतु केवळ आपला देशच या भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे असे नाही. जगात अनेक राष्ट्रांना या भ्रष्टाचाराच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. जगातील एकही देश भ्रष्टाचारमुक्त नाही.
भ्रष्टाचाराची रुजलेली पाळेमुळे इतक्या सहजासहजी उपटून काढणे सहज शक्य वाटत नाही. जागतिक स्तरावर अनेक प्रगत राष्ट्रेही या भ्रष्टाचाराच्या प्रवृत्तीने पोखरलेली दिसतात. गेल्या काही वर्षांचा विचार करता भ्रष्टाचार होणाऱ्या राष्ट्रांच्या यादीत भारताच्या स्थानात काही प्रमाणात सुधारणा होताना दिसत आहे. ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल (टी.ई.) ही संस्था दरवर्षी करप्शन पर्सेप्शन इंडेक्स (सीपीआय) अर्थात भ्रष्टाचार निर्देशांक विषयाची यादी जाहीर करते. यात निर्देशांक बनविताना 12 पाहणी अहवालांचा आधार घेऊन भ्रष्टाचारात देशांचा स्तर ठरवला जातो. या यादीच्या अहवालानुसार 2013 साली 175 देशांच्या यादीत भारताचा क्रमांक 94वा होता. मात्र 2014 साली यात सुधारणा होऊन हा क्रमांक 85 वर आला होता. 2015 साली 168 देशांच्या यादीत भारताचा क्रमांक हा प्रगती होऊन 76व्या क्रमांकावर आला होता. हा क्रमांक भारतासाठी समाधानकारक आणि सुधारित असा होता.
2015च्या निर्देशांक यादीनुसार जगात भ्रष्टाचार कायम असल्याचाच संकेत मिळाला. मात्र 2016 साली पुन्हा स्थानात घसरण होऊन भारत 79व्या स्थानी घसरला. पुढे 2017 मध्ये ही घसरण सातत्याने पाहायला मिळाली. 2017 मध्ये भारत 79व्या स्थानावरून 81व्या स्थानापर्यंत खाली घसरला. पुढेही म्हणजेच गेल्या दोन वर्षांत भ्रष्टाचार कमी झाल्याचे दिसत असले तरी आकडेवारीनुसार फारशी प्रगती दिसली नाही. यावर्षी 180 देशांच्या यादीत किरकोळ सुधारणा होत भारत 78 व्या स्थानी आला आहे. सेवा सुविधा केंद्रांचे संगणकीकरण केल्याने यावर्षी काही प्रमाणात भ्रष्टाचारात घट झाल्याचे सर्वेक्षणकर्त्यांचे मत आहे. आता पुढील वर्षी हा निर्देशांक देशाला कोणत्या स्थानावर नेणार हे येणारा काळच सांगेल.
मुळात भ्रष्टाचाराची नेमकी व्याप्ती आणि व्याख्या काय हे समजून घेणेही महत्त्वाचे आहे. “आपल्या हातात असलेल्या सार्वजनिक सत्तेचा, स्वतःच्या खासगी फायद्यासाठी गैरवापर करणे म्हणजे भ्रष्टाचार होय.’ भ्रष्टाचाराची अशी व्याख्या ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल या संस्थेने केली आहे. सार्वजनिक सत्ता म्हणजेच राजकीय सत्ता होय. राजकीय सत्तेचा दुरुपयोग करून अनेकदा भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जाते. आज भ्रष्टाचाराची विविध कारणेही सांगितली जातात. ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल संस्थेने दिलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, प्रसार माध्यमे आणि पत्रकार यांची गळेचेपी हे भ्रष्टाचाराचे मुख्य कारण आहे. साहजिकच प्रसार माध्यमे/पत्रकार यांना स्वातंत्र्य आणि संरक्षण बहाल केले तर ते भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढतील. आणि मग यातून काही प्रमाणात का होईना भ्रष्टाचार कमी होईल अशी अशा वाटते.
भ्रष्टाचारात लाच, चिरीमिरी घेणाऱ्यांना प्रामुख्याने दोषी मानले जाते. टेबलाखालून लाच घेणाऱ्याचे हात आपल्याला सर्रास दिसतात. परंतु अशा भ्रष्ट लोकांना लाच देऊन भ्रष्टाचाराला खतपाणी देणाऱ्या सर्वसामान्यांचे हात आपल्याला दिसत नाहीत. स्वयंशिस्त ही भ्रष्टाचारासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तत्त्वांचे पालन करून भ्रष्टाचारास कोणत्याही प्रकारचे प्रोत्साहन देणार नाही हा अट्टाहास प्रत्येकाने करायला हवा. अनेकदा कागदपत्रांची कमतरता किंवा अपूर्ण कागदपत्रांवर काम जलद व्हावे या हेतूने आपण स्वतःच लाच देऊन भ्रष्टाचाराला निमंत्रण देतो. आज घेणारे हात शेकडो असतील तर देणारे हातही हजारो आहेत हे विसरून चालणार नाही.
लाच घेणाऱ्यांवर जशी कडक कारवाई होते तशीच कारवाई लाच देणाऱ्यांवरही व्हायला हवी. आपण विविध वस्तूंची खरेदी करतो पण चार पैसे कमी जातील म्हणून बिलाची पावती मागत नाही. यातून आपणच सरकारच्या कराचे उत्पन्न कमी करत असतो हे आपल्या लक्षात येत नाही आणि हीच सवय पुढे भ्रष्टाचारी मनोवृतीला चालना देते. मी स्वतः भ्रष्टाचार करणार नाही. शासन दरबारातील एखादे काम उशिरा झाले तरी चालेल पण मी कोणाला लाच देणार नाही आणि कोणत्याही प्रसंगात लाच खाणारही नाही अशी मनोवृत्ती जोपासावी. देणारे हजारो हात घेणाऱ्या मोजक्याच हातांना पोसत असतात. हे केवळ घेणाऱ्यांनाच नाही तर भ्रष्ट मनोवृत्तीला पोसत असतात हे लक्षात घ्यावे.