कोण्या एका अज्ञात शक्तीने, चंद्र-तारे जन्माला घातले. ग्रहमाला जन्माला घातली. झाडे, झुडपे, वृक्ष, वेली हे सगळे जन्माला घातले. पुढे हवा आली. पाणी आले. अमिबा नावाचा एकपेशीय जीव जन्माला आला. कुठून आला माहीत नाही. पण आला एक जीव जन्माला. त्यातून उत्क्रांती होत होत कोट्यवधी जीव विकसित झाले. या पृथ्वीवर वावरले. अनेक नामशेष पावले. काही तग धरून राहिले. उत्क्रांती होत होत माणूस आकाराला आला. आणि आजवर निसर्गातल्या इतर कोणत्याच घटकाने नव्हे पण माणसाने निसर्गावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली.
माझी बायको, माझी मुलं, माझं कुटुंब, माझं घर, माझं अंगण, माझं शेत, माझा बांध, माझं गाव, माझं राज्य, माझा देश… देशाच्या सीमेच्या पलीकडे माणसाची धाव जाते ती केवळ स्वतःचा विकास, स्वतःची प्रगती डोळ्यासमोर ठेवून. तो जगाच्या कल्याणासाठी देशाच्या सीमा ओलांडत नाही. एक जवान सोडला तर देशाच्या कल्याणासाठी कुटुंबावर तुळशीपत्र ठेवणारी माणसं अपवादानेच सापडतात.
पण झाडं-झुडप, वृक्ष-वेली, पशु-पक्षी निसर्गाशी नेहमीच समर्पित भावनेने वागत आले आहेत. झाडांनी रुजण्यासाठी मातीचा आधार घेतला. पण त्याचवेळी पाचोळा होऊन मातीचे कण झाले. डोंगरांनी जलधारा दिल्या आणि त्या जलधारा पुढे नद्या झाल्या. त्या नद्यांनी आपल्यासोबत गाळ वाहून आणला. त्या गाळाने सुपीक प्रदेश दिले. त्या सुपीक प्रदेशाने धनधान्य दिलं. माणसाने तिथे वस्ती केली. सुपीक प्रदेश निर्माण करून नद्या समुद्राला मिळाल्या. वाफ झाल्या. आभाळात गेल्या. ढग झाल्या. गार वाऱ्याच्या स्पर्शाने पाऊस झाल्या. डोंगरावर उतरल्या. पुन्हा नद्या झाल्या. हरीण जन्माला आले. वाघाचे भक्ष्य झाले. मासा जन्माला आला बगळ्याचा भक्ष्य झाला. बेडकाने जन्म घेतला आणि तो सापाचे भक्ष्य झाला. साप गरुडाचे भक्ष्य झाला. गरुड वार्ध्यक्याने मृत पावला आणि मातीत मिसळून गेला. यापैकी कोणाच्याही नावावर कुठला सातबारा नाही. धनदौलत नाही. पैसाअडका नाही. यातलं कोणीही दुसऱ्याच भक्ष्य होताना कसली तक्रार करीत नाही. परंतु माणसाला मात्र कोणाचे भक्ष्य व्हायला आवडत नाही. केवळ भक्ष्यण करणे हाच आपला धर्म असल्याच्या तोऱ्यात वागतो माणूस.
आम्ही नेहमी पाण्यातच का रहायचं? म्हणून मासा तक्रार करत नाही. आणि आम्ही कायम स्वतःला जमिनीत गाडून का घ्यायचं म्हणून झाडांची मुळं रडगाणं गात नाहीत. मुळं जमिनीकडून पाणी आणि पोषक द्रव्ये घेतात. पाना-फुलांना देतात. पानं सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने अन्न तयार करतात. झाडाच्या मुळांना आणि इतर अवयवांना पुरवतात. फुलं गंध राखून ठेवत नाहीत आणि फळं बिया झाकून ठेवत नाहीत. इथेच ओंजळ भरून घ्यावी आणि इथेच रीती करावी याची जाणीव असते निसर्गातल्या प्रत्येक घटकाला. पण माणसाला मात्र तिजोऱ्या भरून ठेवण्यात धन्यता वाटते. पोट भरल्यानंतर ढेकर निघेपर्यंत अन्नग्रहण करण्यात, जिभेचे चोचले पुरवण्यात, संपन्नतेच्या मृगजळामागे धावण्यात सार्थकता वाटते माणसाला. आपण येताना कमरेचा करगोटासुद्धा सोबत आणला नव्हता. आणि जातानाही तो सोबत नेता येणार नाही याची जाणीव असते माणसाला. तरीही हातात सोन्याची कडी घालण्यासाठी आणि गळ्यात सोन्याचे गोफ घालण्यासाठी जीवाचा आटापिटा करतो माणूस. हा देह निसर्गाने दिला आणि तो पुन्हा निसर्गातच विलीन होणार आहे याचे भान नसते माणसाला. त्यामुळेच आपले भरणपोषण करणाऱ्या निसर्गाचे भरणपोषण करावे असे मनात येत नाही माणसाच्या.
माणसाने जमिनीवर, सागरावर हक्क सांगितला. माणसाने नदीवर हक्क सांगितला. माणसाने विहिरीतल्या पाण्यावर हक्क सांगितला. खरंतर जो समुद्र निर्माण करतो तोच विहिरीही भरतो. माणूस कशाचीही निर्मिती करीत नाही. तो फार तर उभारणी करू शकतो. माणूस ताजमहाल उभारेल. पण त्यासाठी लागणारा संगमरवर निर्माण नाही करू शकत. माणूस भगवंताची मूर्ती साकारू शकेल परंतु त्यासाठी लागणाऱ्या पाषाणाचा शोध घेण्यासाठी त्याला निसर्गाच्या उदरातच हात घालावा लागेल. माणसामधला परोपकारभाव हरवत चालला आहे. माझा लाभ काय? यापलीकडे कोणाचीही दृष्टी जात नाही. अवतीभवती केवळ लबाडांचा बाजार भरला आहे. यांना आवरायचे कोणी? कारण “भले तरि देऊं, कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी, हाणू काठी’ असे म्हणणारे संत आता राहिले नाहीत. अलीकडचे प्रबोधनकारसुद्धा जगाला शहाणे करून सोडण्यापेक्षा जगाला हसवण्यात धन्यता मानत आहेत. भाविक प्रवचनाला म्हणून जातात. पोट धरून हसतात. आणि जे काही चिमूटभर शहाणपण कानावर पडलेले असेल ते तिथेच सोडून येतात. ओंजळीशी आलेलं शहाणपण हस्यामध्ये विरघळून जातं आणि मग आयुष्यच हसू होतं.
विजय शेंडगे