नवी दिल्ली – वादग्रस्त विधान केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या विरोधात देशभर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या सगळ्यांचा दिल्लीत एकत्रित तपास केला जावा अशी मागणी करणारी याचिका शर्मा यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.
मात्र त्याच्या सुनावणीच्या वेळी आज न्यायालयाने नुपूर शर्मा यांना चांगलेच फटकारले. तुम्ही देशात आग लावण्याचे काम केले असून तुम्ही माफी मागायला हवी अशी कठोर टिप्पणी न्यायालयाने केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आगीत तेल ओतणारे तेवढेच जबाबदार असल्याचे सामाजिक कार्यकर्त्याने म्हटले आहे.
एका कार्यक्रमात बोलताना सामाजिक कार्यकर्ते अंबर झैदी म्हणाले की, नुपूर शर्मा जेवढ्या जबाबदार आहेत तेवढेच अप्रचार करणारेही जबाबदार आहेत. ज्याप्रकारे शर्मा यांनी ते वक्तव्य केले ते चुकीचे आहे असे आपण म्हणू शकतो. मात्र त्याचा वापर करून व त्याचा प्रचार करून लोकांना ज्याप्रकारे भडकावले गेले,
त्यामुळे ज्याचा दोष नाही अशा निरपराध व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. या लोकांनी आग भडकवण्याचेच काम केले. त्यांनी व्हिडिओत फेरफार करून ते जगभर पसरवले. त्या लोकांसाठी तर आता निदर्शने केली जात आहेत.
हिंदु असो वा मुसलमान…देशात हिंसाचार करणाऱ्या प्रत्येकाला प्रश्न विचारले पाहिजे. हिंदुंना तर प्रश्न विचारले जातील. मात्र मुसलमान व्यक्तीला बिचारा मुसलमान आहे म्हणून विचारले जाणार नाही.