पुणे – करोना संसर्गामुळे मार्च महिन्यापासून बंद असलेले न्यायालयाचे कामकाज येत्या सोमवारपासून (दि.11) नियमितपणे सुरू होण्याची शक्यता आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या वकिलांना लवकरच दिलासा मिळणार आहे. पक्षकारांनाही फायद होणार आहे.
न्यायालय सध्या सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत सुरू असून, केवळ महत्त्वाच्या दाव्याची सुनावणी होत आहे. उच्च न्यायालय आणि बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ऍण्ड गोवाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी मुंबईत झाली. त्यात झालेल्या चर्चेत नियमित कामकाजाबाबत उच्च न्यायालयाने सकारात्मकता दर्शवली आहे.
मुंबईत झालेल्या बैठकीस उच्च न्यायालयातील न्यायाधीश, पदाधिकारी, बार कौन्सिलचे उपाध्यक्ष ऍड. सुदीप पासबोला, माजी अध्यक्ष ऍड. सुभाष घाडगे, ऍड. विठ्ठल कोंडे-देशमुख, सदस्य ऍड. राजेंद्र उमाप, ऍड. उदय वारूंजीकर आणि मुंबई बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि सचिव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
ऑक्टोबरमध्ये लॉकडाऊनचे अनेक नियम शिथिल करण्यात आल्यानंतर न्यायालये पूर्ववत सुरू होतील, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र तेव्हापासून नियमित सुनावणीबाबत तारीख पे तारीख सुरू आहे. पण आता याबाबत पुढील दोन ते तीन दिवसांत अंतिम निर्णय होऊन कामकाजाची कार्यपद्धती असलेली एसओपी जाहीर होऊ शकते.
याविषयी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य ऍड. राजेंद्र उमाप म्हणाले, पुण्यातील कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. येथील कामकाज नियमित सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे.
त्यामुळे सोमवारपासून (ता.11) नियमित कामकाज सुरू होऊ शकते. तसेच, ज्या जिल्ह्यात अद्याप पूर्णपणे कामकाज सुरू झालेले नाही, तेथील करोनाच्या स्थितीचा आढावा बैठकीत घेण्यात आला. तेथील अडचणी दुर करण्याबाबत चर्चाही बैठकीत झाली.