रामचंद्र गुहा, श्याम बेनेगल, मणी रत्नम, कोंकणा सेन यांचाही 49 जणांत समावेश
नवी दिल्ली : जमावाकडून होणाऱ्या हत्यांबाबत चिंता व्यक्त करणारे खुले पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहल्याबद्दल इतिहासकार रामचंद्र गुहा, सीनेदिग्दर्शक श्याम बेनेगल, अदूर गोपाल कृष्णन, शुभा मुदगल, मणी रत्नम, कोंकणा सेन, रेवती, सुमित्रा सेन आणि अर्पणा सेन या नऊ जणांसह अन्य 40 अज्ञातांविरोधात देशद्रोह आणि देशाच्या ऐक्याला बाधा पोहोचविल्याचा गुन्हा बिहारमधील मुझफ्फराबाद पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला.
मुख्य न्यायदंडाधिकारी सुर्यकांत तिवारी यांच्या न्यायलयात स्थानिक वकील सुधीर कुमार ओझा यांनी 27 जुलै रोजी याचिका दाखल केली होती. देशातील वाढत्या असहिष्णुतेचा मुद्दा माध्यमांकडे नेऊन देशाची बदनामी केल्याचा त्यांनी आक्षेप घेतला होता. त्यानुसार न्यायलयाने 20 ऑगस्ट रोजी पोलिसांना गुन्हा नोंदवण्याचा आदेश दिला. त्यानुसार भारतीय दंडसंहितेच्या कलम 124 ए, 153 बी, 160, 190, 290, 297 आणि 504 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला.
एकूण 49 बुध्दीवाद्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून त्यांच्या सरकारच्या काळात उन्मादी हिंसाचार वाढल्याचा आक्षेप घेणारे पत्र लिहले. त्याला वर्तमानपत्र आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांनी प्रसिध्दी दिली. यामागे देशाचा बदनामी करण्याचा हेतू होता, असे ओझा यांचे म्हणणे आहे.