पुणे – राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले आहे. अद्यापही शाळा प्रत्यक्षात सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व त्यांच्या मनावर ताण, दडपण येऊ नये यासाठी सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
करोनामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सतत लॉकडाऊनही वाढविण्यात आले आहे. शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. सीबीएसई बोर्डाने 30 टक्के अभ्यासक्रम कमी केल्यानंतर राज्य शिक्षण मंडळानेही अभ्यासक्रम कमी करावा अशी मागणी पालक, शिक्षकांकडून करण्यात आली होती. या मागणीची गांभीर्याने दखल घेत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने पहिली ते बारावीचा 25 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला होता. त्या प्रस्ताव मान्यता दिल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी (दि.25) केली आहे. शाळा बंद असल्या तरी शिक्षण सुरू राहावे, यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही 15 जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात आले.
ऑनलाइनद्वारे शिक्षण देत असतानाही मर्यादा येतात. त्यामुळे अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा असा मोठा प्रश्न शिक्षक, विद्यार्थ्यांना पडला होता. त्याची चिंता पालकांनी लागली होती. त्यामुळे शासनाने अभ्यासक्रम कमी करण्याचा दिलासादायक निर्णय घेतला आहे. कमी केलेल्या अभ्यासक्रमाची यादी इयत्ता व विषय निहाय राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या ुुु.ारर.रल.ळप या संकेतस्थळावर व बालभारतीच्या ुुु.शलरश्रलहरीरींळ.ळप या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
101 विषयांचा अभ्यासक्रम कमी
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, बालभारती, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या समन्वयाने व अभ्यासक्रम समितीच्या निर्णयानुसार संबंधित विषयांचे सर्व अभ्यासक्रम मंडळाच्या सदस्यांमार्फत अभ्यासक्रम कमी करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. अभ्यासक्रमाचा मूळ गाभा तसाच ठेवून प्राथमिक स्तरावरील 22, माध्यमिक स्तरावरील 20 व उच्च माध्यमिक स्तरावरील 59 अशा एकूण 101 विषयांचा इयत्तानिहाय व विषयनिहाय 25 टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आलेला आहे. भाषा विषयांमध्ये काही गद्य व पद्य पाठ व त्यावर आधारित स्वाध्याय कृती वगळण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापन व वार्षिक परीक्षा यामध्ये या घटकांवर कोणत्याही कृती विचारल्या जाणार नाहीत. व्याकरण किंवा इतर भाषिक कौशल्य वगळण्यात आलेले नाही. इतर विषयांमध्ये कृतीची पुनरावृत्ती टाळणे व काही भाग विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनासाठी देण्यात आलेला आहे, असे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांनी स्पष्ट केले आहे.