काबूल : अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर आज तिथे सरकार स्थापन करण्यात येणार आहे. याच मुद्यावरून आता अफगाणिस्तानमध्ये इथल्या रणरागिणी रस्त्यावर उतरल्या आहेत. हेरात येथे मोठ्या प्रमाणावर महिला आपला जीव धोक्यात घालून रस्त्यावर उतरल्या होत्या. त्यांनी राज्यपाल कार्यालयासमोर निदर्शन करत सरकारमध्ये महिलांचाही पुरेसा राजकीय सहभाग असावा आणि महिलांना मंत्रिमंडळ आणि ज्येष्ठ समित्यांमध्ये स्थान मिळावे, अशी महत्वाची मागणी केली आहे.
रॅलीचे आयोजन करणाऱ्या फ्रिबा काबरजानी यांनी याविषयी माहिती दिली आहे.यावेळी त्या म्हणाल्या, अफगाण महिलांनी गेल्या वीस वर्षांत जे काही मिळविले आहे, त्यासाठी त्यांनी प्रचंड त्याग केला आहे. या विस वर्षांच्या काळात महिलांनी अनेक क्षेत्रांत प्रगती केली आहे. अशा स्थितीत तालिबानने महिला अधिकारांच्या सुरक्षिततेची हमी देऊन सत्तेतही वाटा द्यायला हवा. संपूर्ण जगाने आमचा आवाज ऐकावा आणि आमचे अधिकारांचे संरक्षण करावे, अशी आमची इच्छा आहे.
अफगाणिस्तानच्या सर्व महिलांच्या वतीने आम्ही आमचे म्हणणे तालिबानपर्यंत पोहोचवत आहोत. अनेक महिलांना या मोर्चात सहभागी व्हायचे होते. पण त्यांच्या कुटुंबीयांनी यासाठी परवानगी दिली नाही. तथापि, सुरक्षिततेची पर्वा न करता या मोर्चात सहभागी होण्याचीही या महिलांची इच्छा होती, असे आंदोलक महिलांनी म्हटले आहे.
आणखी एक आंदोलक महिला मरियम अब्राम म्हणाली, तालिबानने सत्ता ताब्यात घेतल्यानंतर, त्यांचे नेते टीव्हीवरून चांगली भाषणे देत आहेत. मात्र, त्यांचे लोक सार्वजनिक ठिकाणी सत्तेचा गैरवापर करत आहेत. आम्ही त्यांना पुन्हा महिलांना मारहाण करताना पाहिले आहे. एवढेच नाही, तर आमची आंदोलने अशीच सुरू राहील. तालिबानची इच्छा आहे, की आम्ही शांतपणे घरातच बसावे, पण तसे होणार नाही, असेही मरियमने म्हटले आहे.