सातारा – सातारा शहरातील शासकीय जागेमध्ये बोकाळलेल्या टपऱ्या आणि त्या आडोशाने चालणारे हप्तेखोरीचे उद्योग यांना सातारा पालिकेने गुरुवारी कारवाईचा दणका दिला. मोती चौक, पंचपाळे हौद आणि पोवई नाक्यावरील शिव पुतळ्यासमोरील बेकायदा खाद्यपदार्थांच्या गाड्या हटवण्यात आल्या. काही राजकीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरडाओरडा करत ही अतिक्रमण मोहीम बंद करण्याचा प्रयत्न यावेळी केला. तेव्हा प्रशासक अभिजित बापट यांनी त्यांचा जागेवरच तास घेतला.
शहरातील अतिक्रमणे आणि त्यानिमित्ताने शहरातील मोकळ्या जागांवर बोकाळलेल्या टपऱ्या यामुळे शहराचे सौंदर्य बिघडले असून त्याला एक प्रकारचा बकालपणा येऊ लागला आहे. मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या आदेशाने अतिक्रमण हटाव विभागाला गुरुवारपासून प्राचारण करण्यात आले. अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम आणि त्यांची टीम ऍक्शन मोडवर आली. सकाळी साडेअकरा वाजता जेसीबी, टिपरसह बारा कर्मचारी आणि प्रशांत निकम राजवाडा परिसरातील पंचपाळे हौद परिसरात दाखल झाले. तेथील पाच ते सहा हातगाडे आणि टपऱ्या हटवण्यात आल्या.
तसेच लोकशाही दिनामध्ये मोती चौकातील एका वडापावच्या गाड्याची तक्रार झाली होती. तो गाडा सुद्धा तेथून हटवण्यात आला. वर्दळीच्या चौकातील गाडा हटवण्यात आल्याने येथील वाहतुकीला रस्ता मोकळा झाला. तेथून अतिक्रमण हटाव मोहीम थेट शिव पुतळ्यासमोरील पोस्ट कार्यालयाजवळ पोहोचली तेथील भेळीच्या, चायनीज आणि वडापावच्या काही गाड्या हटवण्यात आल्या. या गाड्या हटवताना काही राजकीय संघटनांचे पदाधिकारी “माझा भाऊ, माझा भाऊ’ करत तेथे गोंधळ घालू लागले. त्यामुळे काही काळ कारवाई बंद पडली होती.
विक्रेत्यांनी सुद्धा पालिकेच्या या अचानक मोहिमेवर तीव्र नाराजी व्यक्त करत आमच्याच गाड्या उचलायला दिसतात का बाकीची अतिक्रमणे दिसत नाही का, असा राग व्यक्त करत मोहिमेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रशासक अभिजित बापट यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन संबंधितांची चांगलीच हजेरी घेतली. हा येथील शिवतीर्थाचा परिसर स्मारकाचा परिसर असून याची “खाऊ गल्ली’ करू नका. तसेच ही जागा पालिकेच्या सार्वजनिक मालकीची आहे त्याचा योग्य कारणासाठी वापर झाला पाहिजे, त्यामुळे येथे कोणीही टपरी लावू नये, पोवई नाका परिसरात हॉकर्स झोन उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तेथे टपरी चालकांनी तात्काळ जावे, असा आदेश बापट यांनी यावेळी दिला.