नवी दिल्ली – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी आधी निश्चित झाल्याप्रमाणे 27 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. ते प्रकरण त्या दिवशीच्या न्यायालयीन कामकाजाच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.
आता सगळ्यांचेच लक्ष त्या सुनावणीकडे लागणार आहे. शिवसेनेतील बंडानंतर महाराष्ट्रात सत्ताबदल झाला. त्यावरून सुरू झालेला राजकीय संघर्ष थेट सर्वोच्च न्यायालयात पोहचला आहे. त्याविषयीची सुनावणी महाराष्ट्राचे राजकीय भवितव्य निश्चित करणारी ठरणार आहे.
मुंबईतील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यावरून काही दिवस शिवसेनेच्या दोन गटांमध्ये मोठी रस्सीखेच झाली. अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे तो पेच तूर्त तरी सुटला आहे.
उच्च न्यायालयाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यास परवानगी दिली. आता आणखी महत्वाची सत्तासंघर्षाविषयीची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. साहजिकच, त्या सुनावणीविषयीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.