नवी दिल्ली : देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. मात्र या परिस्थितीला कसे हाताळावे हे मोदी सरकसरला अद्याप उमगेना झाले आहे, अशी टीका कॉंग्रेसने सोमवारी केली. इराण आणि अमेरिकेतील संघर्षामुळे तेलाच्या किंमती सातत्याने वाढणार आहेत. मात्र या परिस्थितीला सामोरे जाण्याचे शहाणपण या सरकारकडे नाही. 1991 सारखीच अर्थव्यवस्थेला घरघर लागली आहे, असे कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे.
देशभर सुधारीत नागरिकत्व कायद्याच्या विरोधाचा आगडोंब उसळला होता, त्यावेळी अर्थव्यवस्था सातत्याने खालावत होती. त्यात गेल्या सहा महिन्यात काडीमात्र सुधारणा झाली नाही. गेल्यावर्षीच्या तुलनेत आयात 8.37 टक्क्यांनी तर निर्यात 2.21 टक्क्यांनी कमी झाली आहे. या सरकारकडून आर्थिक धोरणांची मी अपेक्षाच बाळगत नाही, असे या माजी अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे.
अंदाजपत्रकीय अपेक्षेच्या तुलनेत थेट कराचे संकलन केवळ 41.6 टक्के झाले आहे. उद्योग क्षेत्राला 3.4 टक्क्यांनी पतवाढ झालीआहे. त्याच वेळी उत्पादन 3.8 टक्क्यांनी घटले आहे. अन्न महागाई 10 टक्क्यांपेक्षा अधिक झालीआहे. मी म्हटले होते तसे कॉर्पोरेट टॅक्स कमी करून गुंतवणुकीला चालना मिळालेली नाही. मात्र या महत्वाच्या गोष्टींकडे पहायला सरकारकडे इच्छाशक्ती आणि वेळ नाही असे चिदंबरम म्हणाले.
तेलाच्या किंमती अशाच वाढत राहिल्या तर आपल्याला त्याची फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे. मात्र तेलाच्या किंमती आटोक्यात ठेवण्यासाठी सरकारकडे काही योजना असाव्यात असे मला वाटत नाही. 1991च्या उपाययोजना आता उपयुक्त ठरतीला का असे विचारता ते म्हणाले, 1991मध्ये जशी परिस्थिी हाताळली तशी परिस्थिती हाताळण्यात कोणतेही शहाणपण आहे असे मला वाटत नाही.