सध्या राष्ट्रप्रेम आणि प्रखर राष्ट्रवादाची चलती आहे. समाज-माध्यमांतून आपल्या देशाबद्दल चांगले विचार तसंच देशातील चांगल्या गोष्टींबद्दल संदेश फिरत असतात. ही गोष्ट चांगलीच आहे. मात्र अशा संदेशांमध्ये कधी कधी अतिरेकी तर कधी धादांत खोट्या गोष्टी पसरविल्या जातात आणि वस्तुस्थिती विपरीत असते. बऱ्याच देशांत प्रवास केल्यानंतर आणि काही देशांत काम केल्यानंतर मला असं प्रकर्षानं वाटतं की विदेशी लोकांचं आपल्या देशाबद्दल, संस्कृतीबद्दल तसंच लोकांबद्दल जे मत असेल तोच खरा आपल्या देशासाठी “आरसा’ म्हणायला हरकत नाही. अर्थात काही वेळा परदेशी लोकांच्या मनातही भारताबद्दल काही गैरसमज असतात ते दूर करून वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडणं हे अत्यावश्यक असतं. त्यामुळं देशाचा आरसा धूसर झाला असेल तर तो स्वच्छ करणं आपलं कर्तव्य ठरतं.
सुमारे सतरा वर्षांपूर्वी इटली देशातील फ्लॉरेन्स शहरात भटकत असताना एक प्रौढा गाइड या नात्यानं आम्हाला विविध ठिकाणं दाखवीत होती. तिला मी भारताबद्दल विचारल्यावर ती काहीशी भयभीत होऊन म्हणाली की भारत आणि पाकिस्तान यांच्यात लवकरच अणुयुद्ध होऊन सर्वनाश होणार आहे. त्यावर तिला मी धीर देऊन म्हटलं की असं काही होणार नाही. भारत हा एक जबाबदार देश आहे. तरीही ती मला एखाद्या बालकाप्रमाणे पुन्हा पुन्हा विचारीत होती की तुम्ही म्हणता ते खरं आहे का.
स्कॉटलंडमधील अशीच गाइड स्त्री मी शेक्सपिअरच्या हॅम्लेटमधील ओळी म्हणताच उद्वेगानं म्हणाली की इंग्लंडमधील नवी पिढीच शेक्सपिअर विसरत चालली आहे. भारतात मात्र काही लोकांना तरी त्याचं विस्मरण झालेलं नाही याचं तिला समाधानही वाटलं. त्या प्रवासात आणखी एक गमतीशीर घटना घडली. माझे साडू एफआरसीएस डॉक्टर असून ते वर्षातील काही महिने इंग्लंडमध्ये शल्यविशारद या नात्यानं काम करतात. मी त्यांच्याबरोबर एका खेडेगावात सहलीसाठी गेलो होतो. वर्ष होतं 2002. तिथं त्या गावाचा प्रमुख (शेरिफ) आम्हाला भेटला. बोलता बोलता तो डॉक्टरांना डिवचून म्हणाला, तुमची मजा आहे. इथं येऊन शल्यक्रिया करायच्या आणि मिळालेल्या संपत्तीवर नंतर ऐश करायची. त्यावर डॉक्टर ताडकन उत्तरले, त्याचं काय आहे की इथं माझ्यासारखा तज्ज्ञ आणि कुशल शल्यविशारद मिळत नसल्यानं तुमच्या राणीसाहेबांनी मला विनंती करून खास बोलावून घेतलं आहे.
ब्रिटिश वैद्यकीय सेवा ही पूर्णपणे शासनाधीन आहे हे सर्वांना माहीत आहे. एवढं झालं तरी तो गप्प राहिला नाही. मी कोण आहे याची त्यानं चौकशी केली. ओळख होताच तो मला म्हणाला, तुम्ही भारतात मोटारगाड्या बनवता? कुठल्या प्रकारच्या असतात त्या? हा प्रश्न अर्थातच हेटाळणीच्या उद्देशानं केला होता. त्याला मी उत्तर दिलं, तुमच्या देशाच्या मोटार वाहन परीक्षण केंद्रातच माझ्या भारतीय कंपनीनं बनवलेल्या गाड्या आत्ता तपासल्या जाताहेत आणि काही महिन्यांतच त्या तुमच्या रस्त्यांवर धावू लागतील! शेरिफ आश्चर्यचकित झाला. त्याला भारताच्या प्रगतीबद्दल काहीच माहिती नव्हती. नंतर विषय बदलून तो म्हणाला की इंग्लंड तर फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतून उपांत्यपूर्व फेरीतच बाद झाला आहे पण आता नॅटवेस्ट ट्रॉफी क्रिकेट सामने चालू आहेत तिथं मात्र इंग्लंड चांगला खेळ करतंय. मी ताबडतोब प्रत्युत्तर केलं की आपली माहिती इथंही चुकीची आहे. भारतच सर्वात चांगला खेळ करतोय आणि शेवटी भारतच विजयी होणार. आणि नेमकं तसंच झालं. भारतानं ती स्पर्धा जिंकली. त्या इंग्रजाची श्रेष्ठत्व दाखवण्याची खुमखुमी आम्ही जिरवली.
मात्र एक नमूद करायला हवं. साधारणत: 2000पासून भारताची प्रतिमा उज्ज्वल व्हायला सुरुवात झाली. त्याआधी बहुतांश परकीय विशेषत: पाश्चिमात्य भारताला मागासलेला देश तर समजायचेच पण तुच्छही लेखायचे. सामान्य जर्मन लोकांचाही समज असाच काहीसा होता. 2006मध्ये मात्र चित्र खूपच बदललेलं दिसलं. मी म्युनिक शहरामध्ये एका घरी पेइंग गेस्ट म्हणून राहत होतो. ते घर क्लॉडिया नावाच्या प्रौढ स्त्रीचं होतं. ती तिच्या दोन मुलांसह राहत होती. न्याहारी एकत्र करताना आमच्या गप्पा चालायच्या. माझ्याबद्दल आणि भारताबद्दल माहिती समजल्यावर क्लॉडिया अचंबित झाली. तिनं तिच्या शेजारणींना माझ्याबद्दल सांगितल्यावर एके दिवशी संध्याकाळी त्या सगळ्या मला पाहायला आल्या. दुर्दैवानं मला घरी पोचायला उशीर झाल्यानं ती भेट होऊ शकली नाही. पण त्याच शहरात बस स्टॉपवर भेटलेल्या एका निवृत्त जर्मन इंजिनियरनं भारताच्या प्रगतीचं खूप कौतुक केलं. त्यानं भारतात काम केलं होतं. मी नको नको म्हणत असताना त्यानं आठवडाभर बस-ट्रेन प्रवासाला चालणारी तिकिटं माझ्या हातात कोंबली! पुढे मला जर्मन लोकांच्या आग्रहावरून ऑस्ट्रिया देशातील एका आंतरराष्ट्रीय परिसंवादात अभिभाषण करण्यासाठी निमंत्रित केलं गेलं.
पूर्वेकडील देशांत मात्र जरा आधीपासूनच भारताबद्दल चांगलं मत होतं. कदाचित समान संस्कृतीच्या धाग्यामुळे असेल. चिनी लोकांचं भारतीयांवर असलेलं अपार प्रेम पाहून मी थक्कच झालो. चीनला शत्रू समजून माझ्या मनात झालेला त्यांच्याविषयीचा गैरसमज तात्काळ दूर झाला. कामगार, मोठे अधिकारी, विक्रेते तरुण-तरुणी, दुकानदार सगळेच इतके प्रेमानं वागायचे की मला आश्चर्य वाटायचं. भाषेचा अडसर असूनही ते इतकं समजून घ्यायचे की मला माझ्या अशा बाबतीतल्या उतावळेपणाची लाज वाटू लागली. अखेर मी “इंदुआ चुंगुआ शुंगडी’ म्हणजे “हिंदी चिनी भाई-भाई’ असं म्हणू लागल्यावर तर ते हस्तांदोलन करून आलिंगनही देऊ लागले. मदतीसाठी तर ते कायम तत्पर असत.
अमेरिकेत 2004मध्ये कामासाठी सर्वात प्रथम गेलो असता एका लहानशा पण प्रसिद्ध कंपनीचा प्रमुख सुरुवातीला फारच अरेरावीनं वागला.
तिथला एक बलदंड कामगार तर तुच्छतेनंच बोलायचा. पण थोड्याच काळात मी आणि माझ्या सहकाऱ्याचं वागणं, कसब आणि सर्वात मुख्य म्हणजे माझ्या कंपनीबद्दल आणि भारताबद्दल खरी माहिती समजल्यावर कंपनी-प्रमुख मित्रच झाला. त्यानं त्याच्या कामाबाबत माझा सल्लाही मागितला. इतकंच नव्हे तर त्याच्या घरी नेऊन आदरातिथ्यही केलं. निवृत्तीनंतर गोव्यात येऊन राहायची मनीषा त्यानं बोलून दाखवली. पुढे सुमारे दोनशे वर्षांचा इतिहास असलेल्या एका अमेरिकन कंपनीनं 2012 या वर्षी त्यांच्या जगभरच्या अधिकाऱ्यांना काही खास तांत्रिक प्रशिक्षण देण्यासाठी मला आणि माझ्या एका सहकाऱ्याला आमंत्रित केलं. भारताच्या वाढत्या प्रगतीचा आलेख असा मला स्वत:ला अनुभवायला मिळाला. देशाचं आरशात पडलेलं प्रतिबिंब पाहायला मिळालं शिवाय आरसा लख्ख करून ते स्वच्छ करण्याचं पुण्यकर्मही करण्याची संधी मिळाली.
श्रीनिवास शारंगपाणी