पुणे –देशात सन 2014 पूर्वी भ्रष्टाचाराची प्रकरणे सतत घडत होती. मात्र त्यानंतर केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यांचे प्रभावशाली नेतृत्व लाभल्यामुळे देशाला स्वच्छ, पारदर्शी सरकार मिळाले आहे. मागील आठ वर्षांत देशात एकही भ्रष्टाचाराचे प्रकरणे घडलेले नाही, असा दावा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला.
पुणे शहर भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात मुख्यमंत्री पदापासून सुरू झालेल्या वीस वर्षांच्या कर्तव्यपथावर निर्मला सीतारामन यांचे “व्यवस्था परिवर्तनाची वीस वर्षे’ या विषयावर सिंबायोसिय महाविद्यालयातील विश्व भवन सभागृहात व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. त्यात त्या बोलत होत्या. यावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, माजी खासदार प्रदीप रावत, माजी मंत्री दिलीप कांबळे, हर्षवर्धन पाटील, आमदार सुनील कांबळे, प्रा. राम शिंदे, माधव भंडारी, ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. एस. के. जैन, पुणे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक आदी उपस्थित होते.
सीतारामन यांनी मोदी यांच्या गुजरातच्या मुख्यमंत्री पदापासून ते पंतप्रधान पदापर्यंतच्या बावीस वर्षांच्या विकासात्मक कारकीर्दीतील विविध उदाहरणांवर भाष्य केले. मुख्यमंत्री असताना मोदी यांनी गुजरातमध्ये सर्वांगीण विकासावर भर दिला होता. भूकंपाच्या तत्कालीन परिस्थितीत मोदी यांनी उत्तम काम केले. यामुळे गुजरातच्या विकासाचे मॉडेल अतिशय महत्वाचे ठरले आहे, असे सीतारामन यांनी सांगितले.
सध्या भारत देश हा जगातला सर्वांत महत्वाचा देश बनला आहे. मोदी यांनी देशात नवनवीन आधुनिक तंत्रज्ञान आणून डिजीटायझेशनची क्रांती घडवली आहे. विविध योजनांचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याला प्राधान्य दिले. यामुळे योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पाहोचल्या. नागरिकांच्या हिताचे कामे सरकारने केली आहेत. करोनाच्या संकटाच्या कालावधीतही सरकारने महत्वाची भूमिका बजाविली. कोव्हिन ऍपही नागरिकांना लाभदायक ठरले आहे. लसीकरणाची मोहिमही देशभरात प्रभावीपणे राबविण्यात आली, असे सीतारामन यांनी स्पष्ट केले.
मोदी यांनी नागरिकांसाठी विविध नवीन योजना आणल्या. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे संस्कृतीचा अभ्यास होणार असून ऐतिहासिक वारसा लोकांसमोर येणार आहे. देशाता पायाभुत सुविधा निर्माण झाल्या असून मेट्रोसारखे कोट्यवधींची प्रकल्प उभारले जात आहेत. भारत ही मोठी बाजारपेठ निर्माण झालेली आहे, असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.