दोन वर्षांपासून विभक्त राहणारे दाम्पत्य आले एकत्र
पुणे – संवादातील अभाव आणि सोशल मीडियाच्या अतिरेकी वापरामुळे दोन वर्षांपासून वेगळ्या राहणाऱ्या दाम्पत्याला समुपदेशनातून एकत्र आणण्यात यश आले आहे. पूर्वी झालेले सर्व विसरून दोघांनी नव्याने संसार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी समुपदेशक नूतन अभंग आणि दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष ऍड. गणेश कवडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
माधव आणि माधवी (नावे बदलली आहेत) दोघेही उच्चशिक्षित आहेत. तो अभियंता आहे, तर तीही नोकरी करते. जानेवारी 2016 मध्ये दोघांचा विवाह झाला. दोघांना अद्याप अपत्य नाही. किरकोळ कारणावरून दोघांत भांडणे होत असत. भांडण इतके विकोपाला गेले की ऑक्टोबर 2018 पासून दोघे विभक्त राहू लागले. माधव याने ऍड. गणेश कवडे यांच्यामार्फत घटस्फोटासाठी येथील कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला, तर माधवीने नांदायला तयार असल्याचे सांगणारा अर्ज दाखल केला. या प्रकरणात संसार जुळविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
समुपदेशनामध्ये दोघांनी संसार करण्याची तयारी दर्शविली. माधवीकडून अतिरेक प्रमाणात सोशल मीडियाचा वापर केला जात असे, हेही त्यांच्यातील वादाचे प्रमुख कारण होते. या पार्श्वभूमीवर दोघांना काही दिवसांसाठी एकत्र राहण्यास सांगण्यात आले. त्या काळात दोघांनी सोशल मीडियाचा वापर बंद करायचा. एकमेकांना अधिक वेळ देण्याबाबत सांगण्यात आले होते.
माधवीला माहेरच्या लोकांशी कमी बोलण्यास सांगितले. तीन महिन्यांच्या कालावधीत दोघे एकत्र राहिले. वाढलेल्या संवादामुळे भांडण कमी झाले. दोघांनी कायम एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. कौटुंबिक न्यायालयातीला दावे काढून घेण्यात आले. दोघे आता नव्याने हनिमुनसाठी बाहेर गेले आहेत.