समुपदेशकांशी चर्चा करुन तक्रारीवर तोडगा काढण्यावर विशेष भर
पुणे – लग्न झाल्यानंतर काही काळ सुखात गेला. त्यानंतर नवऱ्याच्या मनात संशय आला. तो ही थेट भावाबद्दल. धाकट्या भावाचे आणि पत्नीचे प्रेमप्रकरण असल्याची कुणकुण त्याला लागली. विशेष म्हणजे, त्या संशयावरून त्याने दोघांना मारहाण केली. त्रास सहन न झाल्याने पत्नीने माहेर गाठले. संशयाच्या धुक्याने तुटलेला संसार पुन्हा रुळावर आणण्याकरिता जिल्हा विधि सेवा प्राधिरणाच्या कायदा स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला. त्यांनी नवऱ्याचे समुपदेशन करत त्याच्या मनातील संशय दूर केला.
यासारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या घटनांतून समुपदेशनाच्या आधारे मार्ग दाखविण्याचे काम “चला बोलुया’ तून होत आहे.
नवऱ्याला ताळ्यावर आणण्याकरिता समुपदेशनाच्या कामी नरसिंग व्ही. रणपल्ले, वैभव बंडे या स्वयंसेवक तसेच चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे निरीक्षक भास्कर जाधव, कर्मचारी रमेश निळे यांनी सहकार्य केले. मधुगिता सुखात्मे यांनी समुपदेशनाची भूमिका पार पाडली. “चला बोलुया’ च्या उपक्रमाद्वारे पीडितांना समुपदेशनातून आधार देण्याचे काम केले जाते. यात केवळ संशयाच्या नव्हे तर मारहाण, फसवणूक, शारीरिक-मानसिक त्रास, घटस्फोट यासारख्या अनेक तक्रारींचा पाढा चला बोलुयाच्या व्यासपीठावर वाचला जातो. या माध्यमातून व्यक्तींचे समुपदेशन करुन प्रकरण मिटवणे असा त्यामागील उद्देश आहे. 13 ऑक्टोबर 2013 रोजी स्थापन झालेल्या “चला बोलूया’उपक्रमांतर्गत आतापर्यंत 133 केसेस या विभागाकडे दाखल झाल्या असून त्यापैकी 17 तक्रारी निकाली निघाल्या आहेत.
नवरा आणि बायकोमधील वाद, घटस्फोट, सततची भांडणे, यासारख्या वेगवेगळ्या प्रकारची नाजूक प्रकरणेही यामध्ये हाताळली जात आहेत. तक्रारींवरून अर्जदार आणि ज्याच्या विरोधात तक्रार केली. त्या व्यक्तींचे समुपदेशन केले जाते. थेट न्यायालयात याचिका दाखल करण्यापूर्वी समुपदेशकांशी चर्चा करुन तक्रारीवर तोडगा काढण्यावर विशेष भर या उपक्रमांतर्गत दिला जात असल्याचे पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सी.पी.भागवत यांनी सांगितले.