भाजपच्या काळात महाराष्ट्रात सर्वाधिक भ्रष्टाचाराची प्रकरणे
मुंबई: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपवर जोरदार टीकांचा मारा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या काळात सर्वात जास्त भ्रष्टाचाराची प्रकरणे महाराष्ट्रात झाल्याचे म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी नॅशनल क्राइम रेकॉर्डस ब्युरोच्या रिपोर्टचा हवाला दिला आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या काळात मात्र भ्रष्टाचाराला वाव नाही, भ्रष्टाचाराला आळा बसण्यासाठी आरोपींवर योग्य कारवाई करण्यास राज्यसरकार सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये म्हटल्याप्रमाणे ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ असे दावे करत नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार सत्तेत आले. भ्रष्टाचाराला आळा बसेल अशी आशा ठेवून जनतेने राज्यातही भाजपाला सत्तेत आणले. पण मागील पाच वर्षांत भ्रष्टाचाराला आळा बसण्याऐवजी देशात आणि राज्यातही भ्रष्टाचारात वाढ झाली. चिंताजानक बाब म्हणजे देशात २०१६, २०१७ आणि २०१८ या तीनही वर्षात भ्रष्टाचाराची जेवढी प्रकरणे नोंदविली गेली, त्यापैकी सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात नोंदविली गेली आहेत.
नॅशनल क्राइम रेकॉर्डस ब्युरोच्या नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार ही माहिती मिळाली आहे. राज्यात २०१८मध्ये भ्रष्टाचाराच्या नोंद झालेल्या प्रकरणांपैकी केवळ १५ टक्के प्रकरणांमध्येच आरोपींना शिक्षा झाली आहे. आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण १५ टक्क्यांपर्यंत खाली घसरणे ही कोणत्याही राज्यासाठी गंभीर बाब आहे. ही नामुष्की राज्यावर ओढवण्यास मागील फडणवीस सरकार जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.