शिवस्मारकातील भ्रष्टाचाराची चौकशीची मागणी
नागपूर : शिवसेनेच्या मुखपत्रातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या आरोपांचा दाखला देत शिवसेनेला अडचणीत आणणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी चांगलाच समाचार घेतला.
“पवारांचा नाद करू नका,’ पवार हा एक विचार आहे, तो कळायला दहा जन्म अपुरे पडतील, असा टोला मुंडे यांनी फडणवीसांना लगावला. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत सत्तेत आलेल्या तत्कालीन भाजप सरकारने शिवस्मारकाच्या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार करण्याचे पाप केले, असा आरोप करीत या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी विधानसभेत केली.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होताना धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर केलेल्या टिकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. मुंडे यांनी फडणवीस यांना तीन चाकांचे विमानही असते याची आठवण करून देत तुम्हाला पुन्हा यायला पाच नव्हे तर 15 वर्षे वाट बघावी लागेल, असा टोलाही लगावला!
विविध विकासकामांना हे सरकार स्थगिती देत सुटले आहे, या टीकेचा समाचार घेताना ग्रामविकास विभागामार्फत 25: 15 च्या कामांमध्ये अनियमितता असून पूर्वीच्या सरकारने विकासकामांमध्ये पक्षपाती केला असल्याचा गंभीर आरोपही धनंजय मुंडेंनी केला.
महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत तर देणारच आहे. सोबतच दिलेला प्रत्येक शब्द पाळण्यासाठी कटीबद्ध आहे. पूर्वीच्या सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून फसवणूक तर केलीच परंतु “भीक नको पण कुत्रं आवर’ या म्हणीप्रमाणे शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला. म्हणूनच भाजपच्या हातून नियतीने सत्ता हिरावून घेतली असे परखड मत मुंडे यांनी व्यक्त केले.
भाजपने सत्ता मिळवण्यासाठी साम, दाम, दंड, भेद याप्रमाणे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यासह सर्व सरकारी यंत्रणा वापरल्या म्हणूनच नियतीने 105 आमदार असूनही भाजपला सत्तेपासून दूर ठेवले, असे मत व्यक्त केले. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने शिवसेनाप्रमुखांना दिलेला शब्द पाळला नाही म्हणूनच लोकशाही मार्गाने महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले, असेही धनंजय मुंडे म्हणाले.