मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांची (हिंदवी स्वराज्याची) राजधानी असलेल्या किल्ले रायगडाच्या संवर्धानचे काम महाराष्ट्र सरकारने हाती घेतले आहे. या संवर्धनाची काही कामे सुरळीत सुरु आहेत. मात्र, महाड ते रायगड किल्यापर्यंतच्या रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार होत आहे. तसेच किल्ल्यावर जाण्यासाठीच्या रोपवेच्या कामात दिरंगाई सुरु असल्याचा आरोप रायगड संवर्धन प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. तसेच सारथी संस्थेची स्वायत्तता आणि सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणचा लढा याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आज खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सविस्तर चर्चा केली.
संभाजीराजे म्हणाले, रायगड किल्ला परिसरातील कामांमध्ये कसलाही भ्रष्टाचार चालू देणार नाही आणि कुणाचीही मुजोरी खपवून घेणार नाही ही भूमिका घेऊन मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी माझं पूर्ण म्हणणं ऐकून घेतलं. मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की राजे, रायगड चे काम हे आपल्याच नेतृत्वात झाले पाहिजे ही केवळ माझीच इच्छा नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शिवभक्तांची मागणी आहे. तुम्ही मागील अनेक वर्षांपासून आपण गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करत आहात. तुमची महाराजांच्या किल्ल्यांबद्दल असलेली आत्मीयता आम्ही सर्व जण जाणतो. तुम्ही तिथे आहात म्हणून सर्व काही सुरळीत चालू आहे. तुम्हाला येणारी प्रत्येक अडचण सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. फक्त तुम्ही राजीनामा देऊ नका. यावेळी मी त्यांना आश्वासन दिलं की पूर्वीच्याच जोमाने किंवा त्यापेक्षा जास्त ताकदीने किल्लेसंवर्धन करत राहीन.
यावेळी संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांना सारथी संस्थेच्या स्वायत्तेसाठी आग्रही मागणी केली. मराठा समाजातील हजारो युवकांना या संस्थेचा थेट लाभ होत आहे. समाजातील येणाऱ्या अनेक पिढ्यांना घडवण्याचे कार्य यामाध्यमातून होणार आहे. आणि त्या संस्थेच्या स्वायत्ततेवर कुणीतरी एक हेकेखोर अधिकारी घाला घालण्याचा प्रयत्न करतो हे ठीक नसल्याचे संभाजीराजे म्हणाले.
तसेच मराठा आरक्षणाचा सर्वोच्च न्यायालयात असलेल्या लढ्यात पूर्वीच्याच वकिलांना ठेवण्याची मागणी संभाजीराजेंनी केली. ते म्हणाले, मी स्वतः प्रत्येक तारखेला न्यायालयात हजर असतो. आणि आपली केस व्यवस्थित चालू होती त्यामुळे, वकील तेच ठेवावेत.