जयपूर, – भ्रष्टाचार हा भारताच्या कुंडलीतच आहे व तो कधीच संपुष्टात आणला जाउ शकत नाही असे खळबळजनक विधान राजस्थानच्या कॉंग्रेस सरकारमधील मंत्री शांती धारीवाल यांनी विधानसभेतील चर्चेत उत्तर देताना केले आहे. धारीवाल हे अशोक गेहलोत यांच्या मंत्रिमंडळात संसदीय कार्यमंत्री आहेत. नगर विकास मंत्रालयाचा कारभारही त्यांच्याकडे आहे.
राजस्थान विधानसभेत भ्रष्टाचार या विषयावर चर्चा सुरू होती. यावेळी बोलताना धारीवाल यांनी वेगळीच माहिती देताना सांगितले की देशाचे नामकरण जे राजाच्या नावावरून झाले आहे, त्या राजाच्या कुंडलीतच भ्रष्टाचार होता. केवळ एवढ्यावरच धारीवाल थांबले नाहीत. तर आपला तर्क कसा योग्य आहे हे त्यांनी दुष्यंत आणि शकुंतला यांची पौराणिक कथाही सभागृहात सांगितली. जरा पुराणात राजांच्या कुंडलीतच भ्रष्टाचार असेल तर राज्यांतील भ्रष्टाचार कसा संपुष्टात आणला जाउ शकतो, असा सवाल करताना थोडाफार कमी जास्त असेल मात्र आज सगळीकडेच भ्रष्टाचार असल्याचे ते म्हणाले. केवळ इतकेच नाही, भारतापेक्षा अन्य देशांत जास्त भ्रष्टाचार असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
दरम्यान, आपली निवडणूक प्रणालीच भ्रष्टाचाराला कारणीभूत असल्याचे यावेळी एका अपक्ष आमदाराने सांगितले. आमदाराच्या निवडीसाठी जेवढ्या खर्चाची मुभा देण्यात आली आहे, तेवढ्या पैशात यातील एकही आमदार आज निवडून आलेला नाही. त्यामुळे भ्रष्टाचाराचे मुळ तेथे आहे. असे असल्यावर भ्रष्टाचार कसा संपेल असा सवाल त्या आमदाराने केला.