मंचर -करोना प्रतिबंधक लसीकरण वेगाने होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्रव्यवहार करून लक्ष वेधणार असल्याची माहिती शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथील श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था आणि श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने करोना प्रतिबंधक साहित्य वाटपप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आढळराव पाटील बोलत होते.
यावेळी माजी आमदार शरद सोनवणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माऊली कटके, भैरवनाथ पतसंस्थेच्या संचालिका कल्पना आढळराव पाटील, जिल्हा परिषदेचे गटनेते देविदास दरेकर, शिवसेना सहसंपर्कप्रमुख सुरेश भोर, तालुकाप्रमुख अरुण गिरे, उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, सरपंच अंकुश लांडे, पतसंस्थेचे संचालक सागर काजळे, अशोक गव्हाणे, आबा लांडगे, योगेश बाणखेले, भिकाजी बोकड, सचिव किसन भालेराव, सहसचिव रमेश खरमाळे उपस्थित होते.
माजी खासदार आढळराव पाटील म्हणाले की, करोनाकाळात नागरिकांना धीर देणे, वैद्यकीय उपचार देणे यासाठी माझा सातत्याने प्रयत्न आहे. गेल्या तीन महिन्यांपासून करोनाचा सर्वाधिक फैलाव वाढला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः करोना संदर्भातील आढावा घेऊन आरोग्य विभागास विविध सूचना देत आहे. भविष्यात तिसरी लाट नियंत्रणात ठेवण्याच्या यादृष्टीने सरकारने तयारी सुरू केली आहे.
नागरिकांनी करोना संदर्भातील नियम पाळल्यास करोना नियंत्रणात आणणे शक्य होईल. करोनाच्या पार्श्वभूमीवर श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था व भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून मतदार संघातील नागरिकांसाठी व करोना योद्ध्यांसाठी 10 हजार सॅनिटायझर बाटल्या, 50 हजार मास्क व एक लाख कुटुंबांना रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या अर्सेनिक अल्बमच्या औषधांचे वाटप सुरू आहे, अशी माहिती भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक सागर काजळे यांनी दिली.