मुंबई – सध्या शेअर बाजाराचे निर्देशांक आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे नजीकच्या भविष्यात शेअरबाजारात मोठे करेक्शन होण्याचा इशार काही विश्लेषक देत आहेत. सध्या शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांची आर्थिक परिस्थिती पाहता या कंपन्यांच्या शेअरचे भाव आवश्यकतेपेक्षा जास्त वाढले आहेत.
ऑगस्ट महिन्यामध्ये शेअर बाजारात बरीच खरेदी होऊन मुख्य निर्देशांकात तब्बल नऊ टक्के इतकी वाढ झाली आहे. 4 ऑगस्ट रोजी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 54 हजार अंकावर होता. महिना अखेरीस तो 58,000 अंकावर गेला आहे. जानेवारी महिन्यामध्ये सेन्सेक्स 50 हजार अंकावर होता. केवळ सात महिन्यात हा निर्देशांक 58 हजार अंकावर गेला आहे. त्यामुळे काही विश्लेषक सध्याच्या परिस्थितीमध्ये निर्देशांकामध्ये तब्बल दहा टक्क्याचे करेक्शन शक्य असल्याचा इशारा देत आहेत.
करोना रुग्णांची संख्या कमी होत असतानाच निर्बंध कमी केले जात आहेत. कंपन्यांनी चांगले ताळेबंद जाहीर केले आहेत. पहिल्या तिमाहीत विकास दर वाढला आहे. मॅन्युफॅक्चरिंग आणि सेवा क्षेत्राची उत्पादकता वाढत आहे. महागाई थोडी जास्त असली तरी मवाळ पतधोरणाचे रिझर्व्ह बॅंकेने संकेत दिले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार कमालीचे आशावादी झाले आहेत.
मात्र आतापर्यंत झालेली वाढ ही गरजेपेक्षा जास्त झाली आहे. त्यामुळे आगामी काळात करेक्शन शक्य आहे असे जुलियस बियर इंडिया या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक उमेश कुलकर्णी यांनी सांगितले. आगामी काळात कंपन्यानी अपेक्षापेक्षा कमी नफा असलेले ताळेबंद जाहीर केले व बाजारातून अपेक्षेपेक्षा अपेक्षेइतके मागणी आली नाही तर शेअर बाजाराच्या निर्देशांकावर परिणाम होऊ शकतो.
या वर्षात आतापर्यंत सेन्सेक्स 21 टक्क्यांनी म्हणजे 10,248 अंकांनी वाढला आहे. त्यामुळे शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे बाजारमूल्य रु. 253 लाख कोटींपेक्षा जास्त झाले आहे. या परिस्थितीमध्ये निर्देशांक अपेक्षेपेक्षा दहा टक्क्यांनी जास्त वाढले असल्याचे बऱ्याच विश्लेषकांना आणि गुंतवणूकदारांना वाटत आहेत.
त्यामुळे काही कंपन्यांच्या शेअरची विक्रीही चालू झाली आहे. अशाच प्रकारातून मार्च 2020 मध्ये शेअर बाजार निर्देशांकात 23 टक्क्यांचे करेक्शन झाले होते. भारतातच नाही तर जगभरात महागाई वाढण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे या विषयावर रिझर्व बॅंकांनी विचार सुरू केलेला आहे. अशा परिस्थितीत जर काही रिझर्व्ह बॅंकानी व्याजदर वाढवायला सुरुवात केली तर त्याचा परिणाम शेअर बाजार निर्देशांकावर होऊ शकता.