कात्रज – लॉकडाऊन काळात भाजी किंवा इतर जीवनावश्यक साहित्य खरेदीनिमित्त घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना आळा घालण्यासाठी कात्रज-धनकवडी परिसरातील लोकप्रतिनिधी व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. प्रभागातील घरोघरी जावून प्रत्येकाला भाजी अथवा अन्नधान्य पुरविण्याबरोबरच करोनाच्या काळात नागरिकांनी पाळावयाची नियमावली तयार करून त्यांची पत्रके घरोघरी वाटण्यात येत आहेत.
लॉकडाऊन होवूनही शहरातील करोना बाधितांची संख्या कमी होताना दिसत नाही. सगळे व्यवहार बंद असले तरी नागरिक मात्र भाजी किंवा इतर साहित्य खरेदीसाठी गर्दी करत आहेत. याठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळलेही जात नाही. त्यातूनच करोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे धनकवडी-कात्रज येथील नगरसेवक प्रकाश कदम यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमेवत घरोघरी जावून प्रत्येक नागरिकाला अन्नधान्य पुरविले आहे. त्याचबरोबर तीन दिवसांतून एकदा भाजीसुद्धा पुरविण्यात येत आहे. ऐवढ करूनही नागरिक घराबाहेर पडत असल्याचे लक्षात येत आहे. त्यामुळे आता कदम यांनी प्रभागासाठी एक नियमावलीच तयार केली आहे. त्याचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे. ही नियमावली आता घरोघरी वाटण्यात येत आहे.
करोनाला न घाबरता फक्त आपण घराबाहेर पडणे बंद केले तरीही त्याला आळा घालू शकतो. साधारण वीस दिवस जर एकही जण घराबाहेर पडला नाही तर करोना आटोक्यात येऊ शकतो. त्यामुळे नागरिकांना माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी शक्यतो घराबाहेर पडू नका, एवढ्याच नियमाचे पालन करा.
– प्रकाश कदम, नगरसेवक