नवी दिल्ली, दि. 22 – सीएसआर फंड म्हणजेच उद्योग संस्थांकडून सामाजिक कार्यासाठी जो निधी उपलब्ध करून दिला जातो त्याचा वापर सरकारी योजनांमध्ये केला जात नाही असा खुलासा अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात यावर झालेल्या चर्चेच्यावेळी केला. यावेळी त्यांनी विविध राज्यांमध्ये उद्योग संस्थांकडून सामाजिक कार्यासाठी किती निधी उपलब्ध झाला याची माहितीही दिली.
ते म्हणाले की, या योजनेतून महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 12 हजार 700 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्या खालोखाल गुजरातमध्ये 3926 कोटी आणि आंध्र प्रदेशात 3542 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. केंद्र सरकारी योजना राबवण्यासाठी आम्ही या निधीचा वापर करीत नाही, असे ते म्हणाले. कोणत्या कार्यासाठी कोणत्या उद्योगाने किती निधी द्यायचा याबाबत केंद्र सरकारकडून कोणताही हस्तक्षेप केला जात नाही.
उद्योग संस्थांनी त्यांना होणाऱ्या नफ्यापैकी दोन टक्के निधी हा सामाजिक कार्यासाठी द्यावा, असा नियम करण्यात आला आहे. ज्या कंपन्या असा निधी खर्च करीत नाहीत त्यांना त्याचे कारण द्यावे लागते, असे ते म्हणाले. औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांनाच स्वतःची बॅंक स्थापन करण्याची अनुमती दिली जावी, अशी शिफारस रिझर्व्ह बॅंकेच्या एका समितीने केली आहे. त्यावर रिझर्व्ह बॅंकेने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.