नवी दिल्ली – देशामध्ये गेल्या काही दिवसांपासून करोना विषाणू संसर्गाचा वेग पुन्हा एकदा वाढल्याचं पाहायला मिळतंय. देशातील करोना रुग्णांची संख्या वाढण्यामागे करोनाचा नवा स्ट्रेन तर कारणीभूत नाही ना? अशी भीती व्यक्त करण्यात येतीये. अशातच गेल्या महिन्याभरात महाराष्ट्र व केरळ या दोन राज्यांमधील ८०० ते ९०० नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी (जनुकीय संरचना) पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आलेल्या नमुन्यांचे निकाल येत्या ३ ते ४ दिवसांमध्ये हाती येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्रालयातील सुत्रांकरवी मिळाली आहे. यामुळे राज्यातील जनतेसाठी पुढील ३ ते ४ दिवस धाकधुकीचे राहणार आहेत.
आतापर्यंत ६००० नमुन्यांचे जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात आले आहे. मात्र असं असलं तरी जीनोम सिक्वेन्सिंगमधून केरळ येथील करोना बाधितांची संख्या वाढण्यामागे नवा स्ट्रेन कारणीभूत आहे अशी माहिती अद्यापतरी मिळाली नाही. याच पार्श्वभूमीवर मुंबई व केरळ येथील करोना परिस्थितीवर आरोग्यविभागाचे बारीक लक्ष असून येथे करोनाचे ‘क्लस्टर’ तर बनत नाहीयेत ना? याची चाचपणी करण्यात येत आहे.
युरोपमध्ये हाहाकार माजवणारा करोनाचा ‘ब्रिटन स्ट्रेन’ भारतामध्ये तेवढा घातक ठरला नाही. मात्र ब्राझील व साऊथ आफ्रिका येथे आढळून आलेले स्ट्रेन देखील भारतातील काही रुग्णांमध्ये सापडलेत. मात्र हे विषाणू आधीच्या करोना विषाणूपेक्षा अधिक घातक आहेत की नाहीत हे कोडं अद्यापतरी उलगडलं नाहीये.
करोना विषाणूच्या वाढत्या प्रसारास अटकाव करण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्र, केरळ, गोवा, पंजाब व बंगळुरू येथील आरोग्य यंत्रणेला मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यामध्ये अधिकाधिक चाचण्या व जीनोम सिक्वेन्सिंग करण्याचे निर्देश देण्यात आलेत.
तत्पूर्वी, महाराष्ट्रामध्ये करोना बाधितांची संख्या वाढू लागल्याने राज्य सरकारने करोनाविषयक निर्बंध नव्याने लागू केले आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेला संबोधित करताना येत्या आठवड्याभरामध्ये करोनाची परिस्थिती लक्षात घेऊन पुढील निर्णय घ्यावा लागेल असं म्हंटलं होत. तसेच लॉक डाऊन नको असल्यास जनतेने करोनासंबंधीच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन केले.