राहुल गणगे
पुणे -करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्यासर्वत्र सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत दुकाने सुरू आहेत. मात्र, या वेळेमध्ये उदरनिर्वाह होत नसल्याने त्या वेळेमध्ये वाढ करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाशी चर्चा करून सकारात्मक निर्णयघेतला जाईल, अशी माहिती दिली.
परंतु पुण्याचाकरोनाबाधित दर हा 3.9 टक्के इतका आहे. त्यामुळे पुणे शहराला निर्बंधात शिथिलता देण्याबाबत आज निर्णय होणार आहे. परंतु जिल्ह्यात काही गावागावांत करोना रुग्णांची संख्या वाढत आहे.
त्यामुळे करोना निर्बंधातून शहराची सुटका अन् जिल्ह्याला विळखा अशी अवस्था निर्माण झाली आहे. याबाबतसरकारने योग्य निर्णय घेण्याची गरज आहे. त्यामुळे आजच्या निर्णयाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सध्या शिरूर, हवेली, इंदापूर, बारामती दौंड, भोर, वेल्हा, मुळशी, पुरंदर, खेड, जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील गावागावांत सर्वत्र करोना लसीकरण सुरू आहे. परंतु काही गावातील लसीकरण सुरळीत सुरू आहे, तर काही गावे अद्यापही लसीकरमापासून वंचित आहेत. तर काही गावागावांत करोना रुग्णसंख्या पुन्हा जोर धरु लागली आहे.
यामुळे जिल्हा पुन्हा करोना नियमांच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. सध्या नागरिक करोनाचे निर्बंध मुक्त झाल्यासारखे गावागावांत फिरत आहेत. यामुळे करोना रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सध्या तिसऱ्या टप्प्याचे निर्बंध लागू आहेत.
दरम्यान, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवलीआहे.दुसऱ्या लाटेत झालेल्या सर्वाधिक रुग्ण वाढीपेक्षातिसऱ्या लाटेत दीडपट रुग्ण होण्याचा अंदाजठेवून बेडचे नियोजन करण्याच्या सूचना शासनाने केल्या आहेत.
परंतु आजच्या मंत्रिमंडळ निर्णयात शहरासह जिल्ह्यालाही निर्बंधातून मुक्तता मिळणार कि निर्बंधात वाढ होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे व्यवसायाची घडी पूर्णपणे विस्कटली आहे. त्यामुळे येथून पुढे व्यावसायावर निर्बंध आणू नयेत. निर्बंध आणल्यामुळे व्यावसायिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे व्यावसायिकांना सरकारने आर्थिक मदतीची घोषणा करावी.
तसेच करोना रुग्ण संख्या कमी झाली असून लसीकरणही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातही निर्बंधातून मुक्तता देण्याची गरज आहे.
– विकास जगताप, अध्यक्ष, व्यापार आघाडी भाजप पश्चिम महाराष्ट्र प्रदेश.
सध्या दुकाने बंद बाबत मोठा संभ्रम आहे. दुकाने पूर्ण वेळ उघडता येत नसल्याने व्यावसायावर मोठा परिणाम झाला आहे. एकीकडे करोनामुळे दुकाने बंदची सक्ती आहे. तर तरदुसरीकडे दुकानांचे भाडे तसेच बॅंकेचे हप्ते भरावेच लागत आहेत.
त्यामुळे सर्वच व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत त्यामुळे शासनाने पूर्ण वेळ दुकाने उघडण्याची परवानगी दिल्यास सर्व व्यवसाय पूर्ववत सुरू होतील, तसेच जनजीवन सुरळीत होऊन आर्थिक गाडा रुळावर येईल.
– अनुप गांधी, किराणा व्यावसायिक शिक्रापूर.