नवी दिल्ली – मागील एक वर्षांहून अधिक काळापासून जगभरात थैमान घालत असलेला करोना संसर्ग मध्यंतरी आटोक्यात आला होता. मात्र करोना संसर्गाने आता पुन्हा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे भारतासह अनेक देशात पुन्हा लॉकडाऊन करण्याची स्थिती निर्माण झाली आहे. रुग्णवाढीचा दर जगभरात मागच्या वर्षीपेक्षा वाढला आहे. मात्र मृत्यूदर घटल्याने अनेक देशांनी सुटकेचा श्वास सोडला. तरी जगभरात करोनामुळे आतापर्यंतचा मृत्यूचा आकडा २५ लाखांच्या पुढं गेला आहेत.
चीनमधील वुहानमध्ये करोना व्हायरसची पहिली केस आढळून आली होती. डिसेंबर २०१९ मध्ये ही केस सापडली होती. त्यानंतर जगभरात करोना संसर्गाचा प्रसार झाला. सध्या जगभरात १२ कोटी २४ लाख ६६ हजार ४३८ केसेस असून यापैकी ९ कोटी ८७ लाख २५ हजार ७८९ रुग्ण बरे झाले असून २७ लाख ४ हजार ९०३ नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला आहे.
जगभरात सध्या २ कोटी १० लाख ३६ हजार 054 ऍक्टीव्ह रुग्ण आहेत. यामध्ये ८९ हजार २६२ रुग्ण क्रिटीकल आहेत. दररोजचा मृत्यूदर सरासरी १० हजारांच्या आसपास आहेत. याचवर्षी २० जानेवारी रोजी आजपर्यंतचे सर्वाधिक १७ हजार ६३२ रुग्ण एका दिवसांत दगावले होते.
भारतात करोनाची दुसरी लाट असून महाराष्ट्रात रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले असून काही ठिकाणी अंशत: लॉकडाऊन लावण्यात आले आहे. भारतात एकूण एक कोटी १५ लाखहून अधिक लोकांना करोनाची लागण झाली. त्यापैकी एक कोटी ११ लाख रुग्ण बरे झाले असून १ लाख ५९ हजारपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात सध्या करोना लसीकरण सुरू आहे. आज दुपारी ३ वाजून ३० मिनिटांपर्यंतची ही आकडेवारी आहे.