मुंबई – महाराष्ट्राला 8 लाख दैनंदिन लसींची गरज आहे, पण फक्त 25 हजार लसी मिळत आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
सध्या राज्यात 84.7 टक्के रिकव्हरी रेट आहे. तसेच राज्याच्या रिकव्हरी रेटपेक्षा देशाचा रिकव्हरी रेट जास्त आहे. राज्यात पॉझिटिव्हिटी रेट 27 वरून 22 टक्क्यांवर आला असला तरी ऑक्सिजन महत्त्वाचा विषय आहे. महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या घटतेय, मात्र त्याचवेळी दुसरीकडे 24 जिल्ह्यांमध्ये करोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. महाराष्ट्रात करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. राज्याचा रिकव्हरी रेट चांगला आहे. लस हा एक महत्त्वाचा विषय आहे. 45 वर्षे तसेच पुढील वय असलेल्या नागरिकांसाठी फक्त 30 हजार व्हॅक्सिन उपलब्ध होत्या. सध्या राज्यात 9 लाख डोस आले आहेत. त्यामुळे 45 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना ते द्यायचे आहेत. राज्यात सर्व ठिकाणी ते वितरीत केले जातील. 1 कोटी 65 लाख नागरिकांना आपण लस दिली आहे. हे सर्व नागरिक 45 वर्षांपेक्षा जास्त आहेत.