मुंबई – महाराष्ट्रात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. करोना रुग्णांची संख्या वाढल्याने बेड अपुरे पडत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आज सर्वपक्षीय नेत्यांची महत्वाची बैठक आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचा थेट इशारा दिला आहे.
बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अगदी दोनच शब्दात आपली भूमिका मांडली आहे. राज्यात लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही. संपूर्ण लॉकडाऊनची वेळ आली आहे. निर्णय घेण्याशिवाय आता पर्याय नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आज राज्यात लॉकडाऊन जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्याचे मुख्यसचिव सीताराम कुंटे यांनी राज्यातील करोना परिस्थितीचं बैठकीत सादरीकरण केलं. त्यांनी राज्यातील रुग्ण, मृतांचा आकडा, औषधांचा उपलब्ध साठा, लसीकरणाची माहिती आणि संसर्गाचा धोका, आदीबाबत माहिती दिली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला लॉकडाऊन शिवाय पर्याय नसल्याचं म्हटलं.