पणजी – महाराष्ट्र, दिल्ली, झारखंड पाठोपाठ आता गोवा सरकारनेही आजपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्यात रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू असणार आहे. तर गोव्यातील कसिनो, रेस्टॉरंट, बार, चित्रपट गृह 50 टक्के क्षमतेनं चालवली जाणार आहेत. तसे आदेश गोवा सरकारने दिले आहेत.
गोवाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तसे संकेत दिले होते. त्यानंतर आज संध्याकाळी गोव्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आम्ही राज्यात टेस्टिंगचे प्रमाण वाढवले आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले आहे, असे सावंत यांनी सांगितले होते.
गोव्यात मंगळवारी 1 हजार 160 जणांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. तर 26 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सोमवारी 900 नवे करोना रुग्ण आढळून आले होते. तर 17 जणांचा मृत्यू झाला होता. गोव्यातील सक्रिय करोना रुग्णांची संख्या 8 हजार 240 वर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गोव्यात रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.
गोव्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांची कोरोना चाचणी
गोव्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येकाची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर करोना चाचणी केली जात आहे. त्यासाठी बांदा गावात आरोग्य यंत्रणेने तयारी केली आहे. या ठिकाणी गोव्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची रॅपिड टेस्ट केली जात आहे.