नवी दिल्ली – करोना विषाणूबाबत बिल्कूल निष्काळजीपणा दाखवू नये, यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जनतेला स्पष्ट इशारा दिला आहे. भलते धाडस नको. कदाचित, आपण कंटाळलो असलो तरी करोना अद्याप कंटाळलेला नाही, असे त्या मंत्रालयाने म्हटले आहे.
देशात करोना संकट पुन्हा गडद बनू लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर, आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव आगरवाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना जनतेला करोनाविषयक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले. करोना काहीच नाही, करोना संकट म्हणजे घोटाळा आहे, मला मास्कची गरज नाही, चला पार्टी करू, करोनाची चिंता करण्यापलीकडेही आयुष्य आहे, अशा प्रकारचा सूर जनतेतून उमटताना दिसतो. मात्र, कुठल्याही स्तरावरचा निष्काळजीपणा समाजातील प्रत्येकाला प्रभावित करू शकतो, अशी परखड भूमिका त्यांनी मांडली. एकीकडे निष्काळजीपणा तर दुसरीकडे अनाठायी भीतीही पसरली आहे.
करोनाबाधित झाल्याने काहींना जगण्याविषयी नाहक काळजी वाटते. काहींना रेमडेसिविर अत्यावश्यक वाटते. त्यातून आधीच ऑक्सिजन सिलिंडर मिळवण्याची लगबग उडालेली दिसते, असे म्हणत त्यांनी अनावश्यक भीती न बाळगण्याचेही आवाहन केले.