नवी दिल्ली – देशभरात या आठवड्यात मोठ्या संख्येने रुग्णवाढ होण्याची शक्यता असल्याचा इशारा केंद्र सरकारला करोनासंदर्भात सल्ला देणाऱ्या पथकातील तज्ज्ञांनी दिला आहे.
आपण दीर्घ काळासाठीच्या उपाययोजनांमध्ये फार वेळ न घालवता आत्ता उद्भवलेल्या परिस्थितीवर तातडीने पावले उचलणे गरजेचे असल्याचा संदेशदेखील या पथकाने केंद्र सरकारला दिला होता. एकीकडे देशात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि लसीच्या डोसचा अपुरा पुरवठा असताना करोनाबाधितांच्या वाढीचे आव्हान समोर उभे ठाकणार असल्याचा इशारा आता तज्ज्ञांनी दिला आहे.
आमचा अंदाज आहे की, या आठवड्यात 4 ते 5 तारखेच्या दरम्यान भारतात रोजची करोना रुग्णसंख्या सर्वोच्च नोंदवली जाण्याची शक्यता आहे.
सरकारने जुलै किंवा ऑगस्टमध्ये अमलात येईल, अशा उपाययोजनांवर काम करणे अनावश्यक आहे. कारण तोपर्यंत दुसली लाट संपलेली असेल, पण पुढचे 4 ते 6 आठवडे आपण हा लढा कसा देणार आहोत, ते ठरवणे आवश्यक आहे. दीर्घकालीन उपाययोजना ठरवण्यात खूप सारा वेळ खर्च करू नका, असे त्यांनी म्हटले आहे.