पाटणा – करोना फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचे पाऊल उचलणाऱ्या भाजपशासित राज्यांमध्ये आता बिहारची भर पडली आहे. ते राज्य उद्यापासून (बुधवार) 15 मेपर्यंत लॉक राहील.
देशातील अनेक राज्यांप्रमाणे बिहारला करोनाच्या दुसऱ्या लाटेने ग्रासले आहे. त्यापार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यामध्ये राज्यव्यापी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार बिहारमध्ये पुढील 10 दिवस कडक निर्बंध लागू होतील. त्या कालावधीत केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याला आणि अत्यावश्यक सेवांना मुभा राहील. लॉकडाऊनच्या काळात इतर आस्थापना आणि सार्वजनिक ठिकाणे बंद ठेवली जाणार आहेत. त्यामध्ये सरकारी आणि खासगी कार्यालयांचाही समावेश असेल. याआधी कर्नाटक, गोव्यासारख्या भाजपशासित राज्यांनीही लॉकडाऊनचा पर्याय निवडला आहे.