जिनिव्हा- भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. भारतातील करोना परिस्थितीवर इतर देशांसह जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्लूएचओ लक्ष ठेवून आहे. भारतात करोनामुळे होणारे बाधित आणि मृतांची संख्या चिंताजनक असून भारत सरकारने करोनाबाधितांची खरी आकेडवारी समोर आणण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले आहे.
वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी म्हटले की, इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मॅट्रिक्स ऍण्ड इव्हॅल्यूशन यांनी ऑगस्टपर्यंत भारतात दहा लाख करोनाबाधितांचा मृत्यू होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. सध्या भारताची स्थिती अतिशय चिंताजनक आहे. भारतातील करोनाबाधित आणि मृतांची संख्या ही दक्षिण-पूर्व भागातील देशांपेक्षाही अधिक आहे. भारताने आणि जगातील इतर देशांनीही करोनाबाधितांची आणि मृतांचा खरा आकडा जाहीर करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले.