पाटण – पाटण शहरात करोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ लक्षात घेऊन नगरपंचायतीने लॉकडाऊनची मुदत वाढवली आहे. बुधवार, दि. 19 ऑगस्टपर्यंत शहरात सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार असून केवळ अत्यावश्यक सेवा चालू राहणार आहेत. मात्र, त्यामुळे दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवावर करोनाचे सावट निर्माण झाले आहे.
पाटण तालुक्यात रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस होणारी वाढ व निर्माण झालेली साखळी तोडण्यासाठी पाटण नगरपंचायतीने कडक लॉकडाऊनची भूमिका घेतली आहे. नगरपंचायतीच्या वतीने पाटण शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले असून केवळ अत्यावश्यक सेवा चालू राहणार आहेत.
दि. 17 जुलै 2020 ला चव्हाण गल्लीत जिल्हा परिषदेत काम करणारा कर्मचारी पहिला करोनाबाधित रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर त्याच्या संपर्कातील दोन जणांचे अहवाल बाधित आले होते. लगेचच नवी पेठ येथील महिलेला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर याच भागात पुन्हा दोन रुग्ण आढळून आल्याने हळू हळू करोनाची साखळी पाटण शहरात वाढत गेली.
आजपर्यंत पाटण शहरात करोना बाधित 34 रुग्ण सापडले आहेत. तर तीन जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून 2 जणांनी करोनावर मात केली आहे. या पार्श्वभूमीवर पाटण शहरात वाढणारी करोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन नगरपंचायतीने 19 ऑगस्टपर्यंत कडक लॉकडॉऊनची अंमलबजावणी केली आहे.
यामध्ये जीवनावश्यक वस्तू व मेडिकल या अत्यावश्यक बाबी केवळ चालू राहण्यासाठी वाव दिला आहे. मात्र, या सर्व बाबींचा फटका गणेश उत्सवावर बसणार आहे. पाटण ही एकमेव बाजारपेठ असून याठिकाणी जवळच्या गावांना दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने गणेश उत्सवात करोनाचे संकट निर्माण झाले आहे. यावर्षी बाजारपेठ बंद असल्याने गणेश उत्सवाची धामधूम कमी होणार आहे.
बाहेरगावाहून येणाऱ्या गणेश भक्तांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे साध्या पद्धतीने गणेश उत्सव साजरा करण्यासाठी प्रशासनाचा आग्रह आहे. पाटण शहरासह तालुक्यातही करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्यात एकूण करोनाबाधितांची संख्या 366 झाली आहे. तर 41 जणांनी करोनावर मात केली आहे.
अद्यापही 300 बाधितांवर उपचार सुरू आहेत तर वीस जणांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे. बाधितांची वाढती संख्या व मृत्यूचे प्रमाण रोखण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. त्याचे पडसाद गणेश उत्सवावर पडणार आहेत. प्रशासनाने दक्षता घेऊन गणेश उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. पाटण शहरात दि. 19 ऑगस्टपर्यंत कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार आहे. बाजारपेठा बंद राहणार असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.