राजगुरूनगर-शहरातील एका करोनामुक्त झालेल्या 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकास पुन्हा त्रास सुरू झाल्याने तणावातून स्वत:चा गळा व हाताची शीर कापून आत्महत्या केली आहे. त्यामुळे राजगुरूनगर बाजारपेठ परिसरात खळबळ उडाली आहे.
संबंधित ज्येष्ठ नागरिक व त्यांच्या पत्नीला दि. 23 जुलै रोजी करोनाचा संसर्ग झाला होता. दोघेही पुण्यातील खासगी रुग्णालयात 15 दिवस उपचार घेऊन मंगळवारी (दि. 4 ) राजगुरूनगर येथे घरी आले होते. ते घरी क्वारंटाइन होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. तर रुग्णालयात अवास्तव खर्च झाल्यावर आणि एक अहवाल निगेटिव्ह आल्यावर ते घरी राहून काळजी घेत होते.
शुक्रवारी (दि 7) त्यांचे पुन्हा स्वॅब घेण्यात आले होते. त्याचा अहवाल येण्या अगोदरच त्यांनी आत्महत्या केली. ज्येष्ठास त्यांचा मुलगा सकाळी उठवायला गेल्यावर वडील रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या जवळ चाकू व कात्री पडलेली होती. शीर कापल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना तात्काळ दवाखान्यात नेले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत त्यांच्या मुलाने खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.