भारताने करोना रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नाची एडीबीकडून प्रशंसा
नवी दिल्ली : करोना व्हायरसचा भारतीय उद्योगांच्या उत्पादकतेवर परिणाम होऊ लागला आहे. निर्याती बरोबर आयातही थंडावली आहे. भारताने करोना व्हायरस पसरू नये यासाठी चांगले प्रयत्न केले आहेत.
आगामी काळात परिस्थिती सुधारली नाही तर भारतीय अर्थव्यवस्थेचे 29 अब्ज डॉलरपर्यंत नुकसान होऊ शकते असे आशियाई विकास बॅंकेने म्हटले आहे. चीनमध्ये निर्माण झालेल्या आरोग्यविषयक आणीबाणीचा संसर्ग भारतासह जगातील बहुतांश देशांना झालेला आहे.
याचा विविध देशांच्या अर्थव्यवस्थावर काय परिणाम होईल याबाबत मूल्यांकन करण्यात येत आहे. बॅंकेने या संबंधात जारी केलेल्या प्राथमिक अहवालात म्हटले आहे की जर परिस्थिती आता आहे तशी राहिली तर भारतीय अर्थव्यवस्थेचे 387 दशलक्ष डॉलरचे नुकसान होऊ शकते.
मात्र परिस्थिती जास्त बिघडली तर हे नुकसान 29 अब्ज डॉलरपर्यंत वाढवू शकते. सध्याची परिस्थिती जवळजवळ सर्वसामान्य आहे आणि ती बिघडत गेली तर अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होऊ शकतो याचे विवेचन बॅंकेच्या अहवालात करण्यात आलेले आहे.
भारताबरोबरच इतर आशियाई विकास अर्थव्यवस्थावर काय परिणाम होऊ शकतो त्याचे विवेचन बॅंकेने केले आहे. सध्या हा व्हायरस चीनमध्ये केंद्रित आहे. एकूण मृत्यू पावलेल्या पैकी 97 टक्के लोक चीनमध्ये मृत्यू पावले आहे.
तर संसर्ग झालेल्या पैकी 93 टक्के लोक चीनमध्ये आहेत. जानेवारीच्या अखेरीस चीनमध्ये करोना व्हायरस उद्वल्यानंतर भारताने त्याची ताबडतोब गंभीर दखल घेऊन अनेक उपाययोजना केल्या आहेत.
परदेशातून आलेल्या पर्यटकांची विमानतळावर तपासणी केली जात आहे. त्यातील संसर्ग झालेल्या भारतीय रुग्णांना ताबडतोब इस्पितळात दाखल करण्यात येत आहे. त्यामुळे भारतात संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 34 झाली असली तरी मृत्यू मात्र आणखी झालेला नाही.
भारतामध्ये सध्या उन्हाळा सुरू होत असल्यामुळे तापमान 30 डिग्री सेल्सिअसच्या वर आहे. हा विषाणू या वातावरणामध्ये जास्त काळ राहू शकणार नाही. ही भारताच्या दृष्टीने जमेची बाब असल्याचे बॅंकेने म्हटले आहे.
सध्याच्या परिस्थितीप्रमाणे परिस्थिती हाताळली तर भारताचे कमी नुकसान होणार आहे. मात्र जर करोना व्हायरसचा परिणाम वाढत गेला तर नुकसान वाढू शकते. सहा महिने परिणाम झाल्यानंतर भारताच्या अर्थव्यवस्थेवर दीड अब्ज डॉलरचा परिणाम होऊ शकतो. मात्र हा परिणाम दीर्घकाळ टिकला तर भारताबरोबरच इतर देशांनाही त्याचा फटका सहन करावा लागणार आहे.
प्राथमिक माहितीच्या आधारावर बॅंकेने हे मूल्यांकन केलेले आहे. या आधारावर विविध देशांना आपल्या अर्थव्यवस्थावर कमी परिणाम होईल यासाठी काय करता येईल यावर विचार करता येऊ शकेल.