भारतात येणाऱ्या चिनी पर्यटकांची संख्या 100%घटली
पुणे – चीनमधील करोना विषाणूच्या उद्रेकामुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे. साहजिकच याचा परिणाम पर्यटनावरही होत आहे. करोना विषाणूच्या परिणामामुळे पर्यटनासाठी भारतात येणाऱ्या चीनमधील नागरिकांच्या संख्या 100 टक्क्यांनी कमी झाली असून, याचा भारतातील पर्यटनावर गंभीर परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
दरवर्षी फेब्रुवारी ते मे कालावधीत चीनमधील हजारो पर्यटक भारताला भेट देतात. भारतीय प्राचीन शैलीतील मंदिरे, विशेषत: बौद्ध विहार, विविध पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांची अधिक असते. मात्र, या संख्येत घट झाली असून, सध्या नागरिकांकडून पर्यटनासाठीच्या सर्व बूकिंग कॅन्सल केल्या जात आहेत. तसेच भारत सरकारकडूनही चीनमधील नागरिकांच्या भारत प्रवेशावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.
या देशातून जाणारी आणि येणारी विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. इतकेच नव्हे तर हॉंगकॉंग, मकाऊ, सिंगापूर, कंबोडिया देशांजवळील देशांमधून भारतात येणाऱ्या पर्यटकांचीही कठोर तपासणी केली जात आहे. केवळ चीनमधूनच नव्हे, तर संपूर्ण आशिया प्रदेशातून येणाऱ्या पर्यटकांची तपासणी केली जात आहे. त्यामुळे दक्षिण पूर्व आशियातील पर्यटकांची संख्या घटली आहे. केवळ भारतात येणारे पर्यटकच नव्हे तर.
भारतातून अन्य देशांमध्ये जाणाऱ्या पर्यटकांमध्येही “करोना’ची दहशत आहे. पाच ते सहा महिने अगोदर बुकिंग केलेल्या पर्यटकांकडून बुकिंगदेखील रद्द करण्यात येत आहे. ऐनवेळी बुकिंग रद्द केल्याने विमान कंपन्यांकडून पूर्ण रक्कम परत मिळत नसल्याने नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे. एकूणच भारतातील पर्यटनावर यामुळे अधिक परिणाम झाला आहे.
– विश्वास केळकर, अध्यक्ष, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन.