पुणे – करोना रुग्णांना उपचारासाठी वाढीव बिल आकारणी झाले असेल, त्या ठिकाणी पुन्हा लेखा परीक्षण करावे, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात जिल्हा नियोजन समितीअंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामाबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, नियोजन उपायुक्त संजय कोलगणे, आणि संबंधित जिल्ह्यांचे जिल्हा नियोजन अधिकारी तसेच विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
यावेळी क्षीरसागर म्हणाले, जिल्हा वार्षिक योजना व नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत जनहिताच्या कामाला प्राध्यान्य देण्यात यावे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे कार्य व विचाराच्या प्रचार प्रसारासाठी विविध उपक्रम घेण्यात यावेत. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने प्रत्येक जिल्ह्यात स्मारक उद्यान उभे करून यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्राची उभारणी, ओपन जीम, कलादालन आदी विकासकामे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून करावीत. तसेच करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत त्यादृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना क्षीरसागर यांनी दिल्या.