नवी दिल्ली : देशात मागील काही दिवसांपासून करोनाचा धोका हळूहळू वाढत असल्याचे दिसत आहे. दिवसेंदिवस आकडेवारी ही वाढतच जात आहे. त्यातच देशात 24 तासांत करोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मंगळवारी दिवसभरात देशात पाच हजार 233 नवीन रुग्णांना करोनाची लागण झाली आहे. ही मागील तीन महिन्यांतील सर्वाधिक रुग्ण वाढ असल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही नवीन आकडेवारी जारी केली आहे.
देशात सक्रिय रुग्णांची संख्या 28 हजारांवर पोहोचली आहे. देशात सध्या 28 हजार 857 रुग्ण करोनावर उपचार घेत आहेत. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत.
#AmritMahotsav#Unite2FightCorona#LargestVaccineDrive
𝗖𝗢𝗩𝗜𝗗 𝗙𝗟𝗔𝗦𝗛https://t.co/KkHUFaGpZt pic.twitter.com/tvrvC37MbU
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) June 8, 2022
महाराष्ट्रात 1881 रुग्ण करोनाबाधित आढळले आहेत. यामध्ये आर्थिक राजधानी मुंबईमध्ये सर्वात जास्त 1242 रुग्णांची नोंद झाली आहे. तर राजधानी दिल्लीत गेल्या 24 तासांत 450 नवीन रुग्ण आढळले आहेत. मध्य प्रदेशात 236, तामिळनाडू 114, गोव्यात 62, छत्तीसगडमध्ये 10 करोनाबाधित आढळले आहेत.
मंगळवारी दिवसभरात 3 हजार 345 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. देशात एकुण 4 कोटी 26 लाख 36 हजार 710 रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. सध्या देशातील करोना रुग्णांचा सकारात्मक दर 98.72 टक्के आहे. तर दैनंदिन रुग्ण सकारात्मकता दर 1.67 टक्क्यांवर पोहोचला आहे. मंगळवारी झालेल्या सात मृत्यूंसह देशातील करोनाबळींचा आकडा पाच लाखांच्या पुढे गेला आहे. भारतात एकुण 5 लाख 24 हजार 715 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.