नवी दिल्ली : देशात कोरोनाने आता आपले चांगलेच हातपाय पसरले आहेत. कोरोनाबाधितांची संख्या जशी वाढत आहे तसाच मृतांचा आकडा देखील वाढत असल्याचे दिसत आहे. कारण आता कोरोनाने देशात सहावा बळी घेतला आहे.
बिहारमध्ये कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. ३८ वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तरुणाला पाटणा येथील एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शनिवारी रात्री तरुणाचा मृत्यू झाला. वैद्यकीय तपासणीत तरुणाला कोरोनाची लागण झाली होती. हा तरुण बिहारमधील मुंगेर येथे राहणारा होता. नुकताच तो कतारमधून परतला होता.
पाटणामध्ये कोरोनाचे दोन रुग्ण सापडले असून यामधील एकाचा मृत्यू झाला असून दुसऱ्यावर उपचार सुरु आहेत. यासोबत भारतात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या सहावर पोहोचली आहे. याआधी शनिवारी रात्री मुंबईत ६३ वर्षीय व्यक्तीचे निधन झाले. मुंबईत कोरोनामुळे मृत्यू झालेली ही दुसरी व्यक्ती आहे. एच एन रिलायन्स रुग्णालयात व्यक्तीवर उपचार सुरु होते. २१ मार्च रोजी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी रात्री ११ वाजून ३ मिनिटांनी त्यांचे निधन झाले.
भारतात कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा ३४७ वर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,कोरोनाची एकूण ३२४ प्रकरणं समोर आली आहेत. यामधील २३ जणांवर उपचार करण्यात आले असून रुग्णालयातून घऱी पाठवण्यात आलं आहे. तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे.